विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या एआय कार्यशाळेच्या व्यासपीठावर प्र-कुलगुरू अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ संपादक डॉ. श्रीराम पवार (दैनिक सकाळ), नंदकिशोर पाटील (दैनिक लोकमत, छत्रपती संभाजीनगर), प्रियदर्शनी हिंगे (संचालिका, मॅक्स उमन चॅलन), फराह खान (न्यूज 18, मुंबई), संतोष शालीग्राम (विभागीय संपादक, दैनिक सकाळ, छत्रपती संभाजीनगर) आणि डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी (संचालक, आयक्यूएसी) यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे नियोजन जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, माध्यम शास्त्र संकुलाचे डॉ. सुहास पाठक आणि आयक्यूएसी चे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी केले. नांदेड शहरातील अनेक पत्रकार, विद्यार्थी आणि संशोधक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
एआय हे साधन, बुद्धी माणसाचीच
पत्रकार म्हणजे बातमीची जननी
नंदकिशोर पाटील यांनी पत्रकारितेची व्याख्या करताना सांगितले की, आधुनिक पत्रकारिता मधील ‘आधु’ आणि ‘निक’ असे दोन प्रवाह आहेत. हातात मोबाईल असलेला प्रत्येकजण पत्रकार झाला असला, तरी पत्रकारितेची मातृत्वाशी उपमा देत ते म्हणाले, एआय आईची जागा घेऊ शकत नाही. जशी आई बालकाला जन्म देते, तशीच बातमीचा जन्म पत्रकार देतो. आपण खरेच बाळशास्त्री जांभेकरांचे वारस असू, तर दर्पण चा वारसा जपला पाहिजे. पत्रकारांनी केलेल्या चुकांबद्दल बोलताना ते म्हणाले, आम्ही एस.टी. महामंडळाला बदनाम केले आणि ग्रामीण भागातील सरकारी वैद्यकीय सेवांवर अन्याय केला. आम्ही नकारात्मक बातम्यांनाच प्राधान्य दिल्याने शासनानेही या सेवांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता सकारात्मक पत्रकारितेची गरज आहे. ब्रेकिंग न्यूजची मक्तेदारी वृत्तवाहिन्यांची राहिलेली नाही. अहमदाबाद आणि बारामती विमान अपघाताच्या घटना सांगताना ते म्हणाले की, या घटनांचे खरे फुटेज काढणाऱ्या छोट्या बालक आणि बालिकेने आपल्या मालकी हक्कासाठी दाद मागितली असती, तर ते दोघे अब्जाधीश झाले असते. लाडकी बहीण योजनेबाबतही ऑपरेटरच्या चुकीच्या वृत्तामुळे गैरसमज पसरवला गेला. सत्याची भीती जोपर्यंत सत्ताधाऱ्यांना वाटत राहील, तोपर्यंत पत्रकारिता जिवंत राहील.
तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हेच यशाचे गमक
प्रियदर्शनी हिंगे यांनी तंत्रज्ञान हे शक्तीचे साधन असल्याचे सांगताना ग्रामीण भागात ते पोहोचविण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याचे मत व्यक्त केले. महिलांविरुद्ध एआयच्या माध्यमातून झालेल्या दुष्परिणामांची उदाहरणे देताना त्यांनी असा सूर काढला की, वापरकर्त्याची मानसिकता शुद्ध असेल, तर तंत्रज्ञानाचा वापरही सकारात्मक आणि प्रभावी ठरू शकतो.
शिक्षण क्षेत्राला उंचावण्यासाठी पत्रकारांची जबाबदारी
पत्रकारितेची व्याख्या बदलायची, मूल्ये नाही
डॉ. श्रीराम पवार यांनी पत्रकारितेच्या व्याख्येवर प्रकाश टाकताना सांगितले की, बातमी, विश्लेषण आणि भविष्यवेध ही खरी पत्रकारिता आहे. काय घडले, त्याचे विश्लेषण काय, आणि त्यातून पुढे काय घडेल, हे सांगणे म्हणजे पत्रकारिता. गेल्या तीस वर्षांत पत्रकारिता ध्येयवेडी ते व्यावसायिक आणि आता धंदेवाईक झाली आहे. पत्रकारांनी मूळ गाभा कधीही न विसरता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या पद्धतीने बातम्या सादर कराव्या लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विशाल पाटील यांनी एआय अँकरमध्ये संवेदनशीलता नसल्याने पत्रकारांनी मानवी जाणीवा जागृत ठेवून पत्रकारिता करण्याचा सल्ला दिला. संतोष शालीग्राम यांनी एआय टूल्सचा वापर करून वर्तमानपत्रात नाविन्य कसे आणता येईल, याचा अनुभव सांगितला. नरेंद्र चव्हाण यांनी दैनंदिन जीवनातील छोट्या घटनांमध्ये एआयचा सकारात्मक वापर कसा करता येईल, हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय गोणारकर यांनी केले.
या कार्यशाळेच्या निमित्ताने एकच सूर स्पष्ट झाला की, एआय हे केवळ एक साधन आहे. त्याचा उपयोग करायचा की गैरउपयोग, हे पत्रकाराच्या बुद्धीवर, प्रामाणिकपणावर आणि संवेदनशीलतेवर अवलंबून आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी मानवी विचारांची आणि सत्यशोधनाची भूक हीच खऱ्या पत्रकारितेची प्रेरणा राहील, असा संदेश या कार्यशाळेने दिला.
