![]()
पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात मानव–बिबट संघर्षाच्या घटना वारंवार घडत आहेत. यात आतापर्यंत २००१ ते २०२५ या कालावधीत ५६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करून मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागातर्फे बिबट्यांना देशभरातील ‘झू’मध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी वन विभागाने विविध राज्यांतील प्राणिसंग्रहालयांना पत्र पाठवून, बिबटे हवे असल्यास आमच्याकडून घेऊन जा, असे कळवले आहे. त्यानुसार अनंत अंबानी यांच्या जामनगर (गुजरात)येथील ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरला ५०, अरुणाचल प्रदेशात ६, बिहारला ५, अशा प्रकारे एकूण सहा राज्यांत ६७ बिबटे पाठवले जाणार आहेत. यासंदर्भातील पत्रव्यवहार पूर्ण झाला असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत हे बिबटे पाठवले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिली. महाराष्ट्राच्या बिबट्यांची डरकाळी आता सहा राज्यांत ऐकायला मिळणार आहे. जुन्नर विभागात सर्वाधिक बिबटे राज्यात सर्वाधिक बिबटे जुन्नर विभागात आहेत. त्यामुळे गेल्या २० ते २५ वर्षांपासून या भागात मानव–बिबट संघर्ष सुरू आहे. या भागात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे येथे १३०० हून अधिक बिबट्यांचे वास्तव्य आहे. ही संख्या वाढू नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. १०४ प्राणिसंग्रहालयांसोबत पत्रव्यवहार जुन्नर भागात बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या वर्षी ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे या भागात बिबट्यांविरोधात मोठा रोष आहे. या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. यासाठी येथून पकडण्यात आलेले बिबटे इतरत्र सोडावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यानुसार वन विभागाने देशभरातील १०४ प्राणिसंग्रहालयांना पत्र पाठवून, बिबटे हवे असल्यास आमच्याकडून घ्यावेत, असे कळवले आहे. नसबंदीचाही प्रयोग जुन्नर भागातील बिबट्यांचा जन्मदर रोखण्यासाठी वन विभागाने थेट नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार करून मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून, भारतीय वन्यजीव संस्थेनेही यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर ५ बिबट्यांवर नसबंदीचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा ५० बिबटे गुजरातला बिबट्यांची वाढती संख्या कमी करण्यासाठी त्यांना इतरत्र पाठवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. त्यानुसार सहा राज्यांत बिबटे पाठवले जाणार आहेत. यापूर्वी २०२४ मध्ये १० बिबटे जामनगरला देण्यात आले होते. ते त्या वातावरणात चांगलेच रमल्याचे वन विभागाने सांगितले. आता पुन्हा ५० बिबटे पाठवले जाणार आहेत. या राज्यांना जाणार बिबटे प्राणिसंग्रहालयाचे नाव — संख्या १) ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, जामनगर (गुजरात) — ५०
२) बायोलॉजिकल पार्क, इटानगर (अरुणाचल प्रदेश) — ०६
३) मणिपूर झुलॉजिकल गार्डन, इरोईसेम्बा (मणिपूर) — ०३
४) संजय गांधी बायोलॉजिकल पार्क, पटना (बिहार) — ०३
५) राजगीर झू सफारी, नालंदा (बिहार) — ०२
६) मिनी झू, भिवानी (हरियाणा) — ०१
७) इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्क, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) — ०२ एकूण — ६७ १०४ पैकी ६ ‘झू’चीच मागणी आलीय १०४ पैकी ६ प्राणिसंग्रहालयांनी आमच्याकडे मागणी केली आहे. त्यांना ६७ बिबटे आम्ही पाठवणार आहोत. जामनगरला ५० बिबटे पाठवणार आहोत. मार्चपासून टप्प्या-टप्प्याने स्थलांतर होईल असे जुन्नर विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितले. केंद्राच्या अंतिम मंजूरीची प्रतीक्षा दीड महिन्यांत पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकारने आम्हाला अंतिम मंजूरी दिली आहे. फक्त आता सेंट्रल झु अथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहोत. संभाजीनगरच्या मिटमिट्याचे प्राणीसंग्रालयाचे काम पूर्ण झाले की, त्यांनाही काही बिबटे देऊ असे जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र देणार ६ राज्यांना ६७ बिबटे:त्यापैकी गुजरातच्या वनताराला ५०, अरुणाचल प्रदेशाला ६, बिहाराला ५ बिबटे देणार
