![]()
ठाण्यातील बदलापूरमधील स्त्री बीज तस्करी रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. नाशिक महापालिकेने मुंबई नाका परिसरातील मालती आयव्हीएफ सेंटरची तपासणी करून काही कागदपत्रे ताब्यात घेऊन बदलापूर येथे आढळलेल्या कागदपत्रांबाबत खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. बदलापूर पूर्व येथील जोवेली भागातील एका रहिवासी इमारतीतून हे रॅकेट चालवले जात होते. आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून बेकायदेशीरपणे स्त्री बीजे काढली जात होती. एका पीडित महिलेने मोबदला न मिळाल्याने तक्रार केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला होता. गरीब आणि गरजू महिलांना हेरून त्यांना एका सायकलसाठी 25,000 ते 30,000 रुपये देण्याचे आमिष दाखवले जात होते. यात 300 हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सखोल तपासणीनंतर कारवाई नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरचे प्रमाणपत्र बदलापूर येथे सापडले होते. त्यामुळे नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही मुंबई नाका परिसरातील सेंटरची तपासणी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. तपासणीअंती काही निष्कर्ष निघाल्यास सबंधितांवर कारवाई करता येईल.-डॉ. जितेंद्र धनेश्वर, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा नाशिक लाखोंच्या किमतीत बीज विक्री कायद्यानुसार एक महिला आयुष्यात फक्त एकदाच स्त्री बीज दान करू शकते, मात्र या रॅकेटमध्ये बनावट आधार कार्ड आणि प्रतिज्ञापत्रे तयार करून एकाच महिलेकडून अनेकदा (काही प्रकरणांत 30 पेक्षा जास्त वेळा) बीजे काढल्याची बाब समोर आली आहे. ही बीजे मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतील नामांकित आयव्हीएफ केंद्रांना लाखोंच्या किमतीत विकली जात होती.
स्त्री बीज तस्करी, नाशिकच्या ‘मालती आयव्हीएफ’ला नोटीस:बदलापूरमधील प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत
