![]()
पुणे येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्
.
या कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञही यावेळी उपस्थित होते.
उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी या कार्यशाळेत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि गांधीनगर येथील इन्फ्लिबनेट केंद्र यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यावेळी इन्फ्लिबनेटच्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली उपस्थित होत्या.
या सामंजस्य करारानुसार, राज्य संस्थात्मक क्रमवारी प्रणाली (State Institutional Ranking System) आणि राज्य उच्च शिक्षण माहिती व्यवस्थापन प्रणाली (State Higher Education Information Management System) या एकात्मिक वेब-आधारित प्रणालींची रचना व विकास केला जाईल. यामुळे उच्च शिक्षणातील गुणवत्ता, पारदर्शकता आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी मानवी भांडवल, अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षणाधारित ज्ञान अर्थव्यवस्था या विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील मुद्द्यांच्या अंमलबजावणीबाबत अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीचा आढावा सादर केला.
राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड यांनी विद्यापीठांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्ता व जागतिक मानांकनावर मार्गदर्शन केले. राज्य संशोधन निधी, महाज्ञानदीप प्रकल्प तसेच पीएम उषा आणि सीएम उषा या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.
