खड्ड्यांमुळे अमरावतीकरांचा जीव टांगणीला:मान्सूनपूर्व नियोजन आणि पॅचवर्कच्या कामात उणीवा उघड




अमरावती शहरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटी उघड झाल्या असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्गत गल्ल्यांपर्यंत सर्वत्र खड्डे पडले आहेत. राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाचा परिसर, रेडीयंट हॉस्पीटलसमोरील रस्ता, मोतीनगर ते राजेंद्र कॉलनीचा रस्ता आणि डी मार्टजवळील साईनगरकडे जाणारे वळण यांसारख्या अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता आणि खड्डा यातील फरक ओळखणे कठीण होते. यामुळे अनेक वाहनधारकांचे अपघात होत आहेत, विशेषतः दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. खराब रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना पाठीच्या आणि मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रुक्मिणीनगरचे रहिवासी सुरेश देशमुख आणि इतर नागरिकांनुसार, प्रशासनाला केवळ कर वसुलीत रस असून, नागरिकांच्या जीवाची किंमत नाही. प्रशासक काळात ही परिस्थिती समजण्यासारखी होती, परंतु आता लोकप्रतिनिधी निवडून आल्याने त्यांनी तरी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांचे पॅचवर्क होणे आवश्यक होते, परंतु ते झाले नाही. त्यामुळे पावसाने विश्रांती घेताच तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी पुढे आली आहे. सखल भागात साचणाऱ्या पाण्यासाठी तात्पुरते पंप लावून पाण्याचा निचरा करावा आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशा सूचनाही काही जागरूक नागरिकांनी दिल्या आहेत. महापालिका प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास अमरावतीकर तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी नुकतेच रस्त्यांचे सर्वेक्षण केले. प्रदेश पदाधिकारी समीर जवंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अनेक रस्ते वाहतूकयोग्य नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात लवकरच आंदोलनाचा निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *