![]()
बारामती विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला, ज्यात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही समावेश होता. मात्र या भीषण घटनेला महिना उलटूनही अद्याप एफआयआर दाखल न झाल्याने आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मृत पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. शिवकुमार माळी म्हणाले, अपघाताची शाहानिशा व्हायला पाहिजे, रोहित पवार यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे, याची सत्यता बाहेर यायला पाहिजे. मला सीबीआयकडून कोणतीही माहिती मिळाली नाही, केवळ ज्या बातम्या येतात त्यातून माहिती मिळते, असे माळी यांनी सांगितले. पुढे बोलताना शिवकुमार माळी म्हणाले, माझी मुलगी जेव्हा ड्युटीवर असायची त्यापूर्वी ती माझ्यासोबत चर्चा करायची. यावेळी एकतर पायलट बदली झाला, सकाळी साडेसहा वाजता कुठले ट्रॅफिक असते? पायलट बदली झाला, विमान बदली झाले, कॅरियरमध्ये पाठीमागे इंधन ठेवले होते. इंधन कसे काय कोणी घेऊन जाऊ शकते? सुरतला गेलेली फ्लाईट आली होती तर इंधन पूर्ण भरलेले होते. एका मिनिटांत 15 किलोमीटरची रेंज आहे. ते विमान अजित पवार यांना बारामतीला सोडून संसदाबादला जाणार होते. कदाचित इंधन जास्त असल्यामुळे मोठी आग लागली. जर इंधन कमी असते तर अनेक लोकांचा जीव वाचला असता, अशी माहिती माळी यांनी दिली. तसेच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, याची सीआयडी चौकशी सुरू आहे, रिपोर्ट समोर आल्यानंतर नक्की काय ते समजेल. जे कायद्यामध्ये आहे, त्या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे. जर कोणी गुन्ह्यात सापडत असेल तर त्यातील कोणालाही सोडले नाही पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा अजित पवारांच्या विमान अपघातामागे काळेबेरे?:राज ठाकरेंचा सरकारवर संशयाचे भूत नाचवण्याचा आरोप; FIR दाखल करून घेण्याची मागणी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सरकार FIR दाखल करून घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे त्यामागे काहीतरी काळेबेरे आहे असा संशय निर्माण होतोय, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. अजित पवारांच्या अपघाताविषयी FIR का नोंदवला जात नाही? या प्रकरणी सरकार का अडथळे आणत आहे? सरकार एका FIR ला का घाबरत आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी या प्रकरणी केली आहे. वाचा सविस्तर
सकाळी 6:30 वाजता कुठले ट्रॅफिक असते?:मी रोहित पवारांच्या मताशी शंभर टक्के सहमत, मृत पिंकी माळीच्या वडिलांची प्रतिक्रिया
