जामखेडमधील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला वेग, दुसरी नोटीस बजावली




जामखेड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जामखेड नगरपरिषद यांनी अतिक्रमणधारकांना दुसरी नोटीस बजावून कारवाईला वेग दिला आहे. बस स्थानकापासून शासकीय दूध संघापर्यंत दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून अवघा एक किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन तासांचा वेळ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी मार्गावरील इतर ठिकाणची अतिक्रमणे यापूर्वी हटवण्यात आली असली, तरी शहरातील अतिक्रमणे अद्याप कायम असल्याने प्रशासनावर टीका होत होती. सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी केलेल्या उपोषणानंतर प्रशासनाने हालचालींना वेग आला आहे. महामार्गाची शासकीय हद्द रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फूट) इतकी आहे. या हद्दीत उभारलेली नियमबाह्य बांधकामे, टपऱ्या व इतर अतिक्रमणे प्रस्तावित रस्ते रुंदीकरणास अडथळा ठरत आहेत. परिणामी शहरातील विविध विकासकामे रखडली असून उजनी धरणातून होणारी पाणीपुरवठा योजना देखील ठप्प असल्याची नागरिकांची तक्रार आहे.दरम्यान, नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन अतिक्रमण हटविण्यासाठी सज्ज झाले असून २६ फेब्रुवारी २०२६ रोजी टपरीधारकांना दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांनी स्वखर्चाने अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी आवाहनात्मक भूमिका प्रशासनाने घेतली आहे.जामखेडकर नागरिकांनी शहराच्या विकासासाठी अतिक्रमण हटविण्याची कारवाई तातडीने पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *