![]()
कळमनुरी तालुक्यातील येगाव येथे कालव्याच्या रस्त्यावरून जातांना दुचाकीस्वाराला काठी व साखळीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकास पाच वर्ष सक्तमजूरी व ७ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश टी. एस. अकाली यांनी मंगळवारी ता. २४ दिला आहे. याबाबत सहाय्यक सरकारी वकिल ॲड. सविता देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल वानखेडे व सतिष सुर्यवंशी हे ता. १४ डिसेंबर २०१२ रोजी कालव्याच्या रस्त्याने दुचाकी वाहनावर जात होते. यावेळी कालव्यावर लावलेल्या इंजिनचा पाईप काढण्यावरून त्यांचा वाद झाला होता. यावेळी रामदास वानखेडे याने अमोल यांना काठीने, साखळीने मारहाण केली होती. यामध्ये अमोल गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी अमोल यांनी दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रामदास याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला होता. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विकास तोटावार, महेंद्र देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एच. अली यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. सदर प्रकरण प्रमुख जिल्हा न्यायाधिश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी रामदास यास पाच वर्ष सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंचाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये तक्रारदार अमोल यास देण्याचा निर्णय देखील न्यायालयाने दिला आहे. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकिल ॲड. एन. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. सविता देशमुख यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक सरकारी वकिल ॲड. एस. डी. कुटे यांनी सहकार्य केले. जमादार सुनीता धनवे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
साखळीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न:एकास 5 वर्ष सक्तमजुरी, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; येगाव येथील प्रकरण
