राज्य सरकारच्या तिजोरीत निर्माण झालेल्या खडखडाटामुळे कंत्राटदारांचे तब्बल 77 हजार कोटी रुपयांचे देणे थकल्याचा गंभीर आरोप राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. विशेष म्हणजे शासनाने दिलेले चेकही ट्रेझरीमध्ये वठत नसल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत
.
सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यात 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यात अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या मते, राज्यातील कंत्राटदारांचे तब्बल 77 हजार कोटी रुपयांचे बिल थकले आहेत. सरकारच्या काही विभागांनी थकबाकीचे चेक दिले आहेत. पण जेव्हा हे चेक बँकेत किंवा टेझरीकडे नेले जातात, तेव्हा तिथे पैसे नसल्याचे सांगण्यात ये. हा कंत्राटदारांची थट्टा करण्याचाच प्रकार आहे.
9 तारखेच्या बैठकीत ठरणार आंदोलनाची दिशा
निधी अभावी केवळ जुनी देयकेच रखडलेली नाहीत. तर सध्या सुरू असलेली विकासकामेही जागीच थांबली आहेत. नव्या कामांना मंजुरी देण्याचे प्रमाणही नगण्य आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी 9 मार्च रोजी राज्यातील शासकीय अभियंता व कंत्राटदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, असे भोसले यांनी सांगितले.
गत वर्षभरात 10 टक्केच रक्कम अदा
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य सरकारच्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याचा फटका राज्यातील विकासकामांना बसत आहे. गतवर्षापर्यंत राज्यातील कंत्राटदारांची एकूण थकबाकी 89 हजार कोटी रुपयांच्या घरात होती. त्यानंतर वर्षभरात सरकारने केवळ 10 टक्के रक्कमच कंत्राटदारांना अदा केली. उर्वरित 77 हजार कोटींसाठी आजही कंत्राटदार सरकारच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. यापैकी अनेकांनी आपल्या खिशातील पैसे टाकून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण वेळेवर बिले मिळत नसल्यामुळे ते आर्थिक तंगीत सापडले. यामुळे काही जणांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या.
विशेषतः अनेकांनी आपल्या मालमत्ता तारण ठेवल्याचेही प्रकार घडले. त्यानंतर आता चक्क राज्य सरकारचे चेकच वटत नसल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती डळमळीत झाल्याची बाब समोर आली आहे.
हे ही वाचा…
राज ठाकरेंचे सरसंघचालकांना खडेबोल:मराठी शिकणाऱ्या जपानी तरुणीचा व्हिडिओ पोस्ट करत मराठीचा सन्मान करण्याचा हाणला टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा सरसंघचालक मोहन भागवत व संघाच्या नेत्यांना खडेबोल सुनावलेत. काही हजार किलोमीटर अंतरावरून येणारे परदेशी पाहुणे इथे महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी भाषा सहज मान्य करतात. ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण तिचा अनादर कधीच करत नाही. हे परक्यांना कळतं, पण काही स्वकीयाना कळत नाही. मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेलेल्या सरसंघचालकांना मुंबईत येऊन मराठीत बोलावे असे त्यांना का वाटले नाही? हे माहिती नाही, असे ते म्हणालेत. राज यांनी या प्रकरणी मराठी शिकणाऱ्या एका जपानी तरुणीचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. वाचा सविस्तर
