![]()
शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन अत्यंत चालाकीने चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही टोळी दर अर्ध्या तासाला कपडे बदलून पुन्हा गर्दीत मिसळत असे. या कारवाईत दोन महिला, एक पुरुष आणि एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका भाविकाची पर्स गर्दीत ब्लेडने कापून चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. यानंतर पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तपासादरम्यान काही महिला आणि पुरुष संशयास्पदरीत्या हालचाली करताना दिसले. धक्कादायक बाब म्हणजे, हे संशयित काही वेळाने कपडे बदलून पुन्हा त्याच भागात वावरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. तिघांना अटक, एक आरोपी फरार टोळीतील महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस परिधान केला होता, मात्र अवघ्या काही वेळातच त्यांनी साड्या नेसून पुन्हा गर्दीत प्रवेश केला. हे वेशांतर पोलीस आणि सुरक्षारक्षकांना चकवा देण्यासाठीच होते. पोलिसांनी या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापटीत एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला, तर इतर तिघांना पोलिसांनी अटक केली. १० महागडे मोबाईल, रोख रक्कत जप्त झडती दरम्यान आरोपींकडून १० महागड्या कंपन्यांचे मोबाईल, रोख १ हजार १७० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय पर्स कापण्यासाठी वापरले जाणारे टोकदार ब्लेड्स आणि कटर पोलिसांनी हस्तगत केले. या टोळीसोबत असलेल्या एका अल्पवयीन बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले असून, त्याला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे. शिर्डी पोलिसांसमोर सुरक्षेचे मोठे आव्हान साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर असतानाच, आता परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वेशांतर करून चोरी करण्याची ही ‘प्रोफेशनल’ पद्धत पाहून पोलीसही अचंबित झाले आहेत. मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आणि अशा टोळ्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. हे ही वाचा… राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीत दावे-प्रतिदावे:शरद पवारांनाच संसदेत पाठवायची अजितदादांची इच्छा होती, रोहित पवारांचा खुलासा देशातील ३७ आणि महाराष्ट्रातील ७ राज्यसभेच्या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उमेदवारीवरून मोठे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक खुलासा केला. “अजितदादांना शरद पवारांनीच राज्यसभेवर जावे अशी इच्छा होती,” असे म्हणत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेला छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा खोडून काढला आहे. सविस्तर वाचा…
शिर्डी पोलिसांकडून आंध्रातील टोळीचा पर्दाफाश:अर्ध्या तासाला वेषांतर करून साई मंदिरात करायचे चोरी; 10 महागडे मोबाईल जप्त
