संतापात भर:खड्डे, उदासीन यंत्रणेने चौथा बळी घेतलाच, अंबड-सातपूर लिंकरोडवर दुसरी घटना, ठेकेदार मात्र मोकाट




शहरातील खड्ड्यांनी आणि उदासीन यंत्रणेने अखेर चाैथ्या निष्पाप नाशिककराचा बळी घेतलाच. अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉईंट भागात चिखल आणि खड्ड्यामुळे नीलेश प्रल्हाद कोतकर (४०) या तरुण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात राेष वाढला आहे. एकीकडे रस्त्यांवर मुरुमाऐवजी माती टाकून ठेकेदार महापालिकेच्या डाेळ्यात ‘मातीफेक’ करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता खड्ड्यांवरून राजकारण तापले आहे. कामटवाडे येथील विमल रेसिडेन्सीमध्ये राहणारे कोतकर मंगळवारी (दि. २८) दुपारी एमएच ३९ जे ४९२१ क्रमांकाच्या दुचाकीवरून घरी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या ५ वर्षांच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले. या हलगर्जीपणाला जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *