![]()
छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच टिपू सुलतानचे शौर्य होते, अशी थेट तुलना करणाऱ्या वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांनंतर माफी मागितली आहे. काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. भाजपने खोडसाळपणा करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनात टिपूचा फोटो लावल्यावरून वाद उफाळल्यावर सपकाळांनी त्यात उडी घेत टिपू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य समकक्ष म्हणून बघितले पाहिजे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याविरुद्ध भाजपने राज्यभर आंदोलन केले. पुण्यात काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्येही दगडफेकही झाली होती. केंद्रीय नेतृत्वाचा निरोप आल्यामुळेच दिलगिरी सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसच्या हातातून निसटणारी मुस्लिम व्होट बँक राखण्यासाठी आपल्या वक्तव्यावर ठाम राहण्याचे सपकाळ यांनी ठरवले होते. मात्र, हा प्रकार काँग्रेसमधील शिवप्रेमींना पसंत पडणारा नाही. तो अंगलट येऊ शकतो, असे लक्षात आल्याने केंद्रीय नेतृत्वाकडून निरोप आला. म्हणूनच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
शिवरायांची टिपूशी तुलना करणाऱ्या सपकाळांचा 72 तासांनी माफीनामा:म्हणाले, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो
