पालकत्वाच्या कक्षा रुंदावण्याची गरज:ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे यांचे प्रतिपादन, बालसाहित्य संमेलनात विचार व्यक्त




पुणे: ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी पालकत्वाच्या कक्षा रुंदावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. मुलांच्या जडणघडणीत साहित्य संमेलनासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, मात्र पालकांनी केवळ स्वतःच्या मुलांपुरता विचार न करता सामाजिक दृष्टीकोन बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले. पुणे येथे आयोजित बालसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विवेक व्यासपीठ, विवेक साहित्य मंच, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण विवेक, विवेक नुक्कड साहित्य मंच, युवाविवेक, शिल्पकार चरित्रकोश, श्री मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे मराठी ग्रंथालय आणि विदिशा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये हे संमेलन पार पडले. यावेळी बोलताना राजीव तांबे यांनी मुलांच्या चित्रकलेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही प्रकाश टाकला. चित्रकला हे व्यक्त होण्याचे एक सशक्त माध्यम आहे. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी पालकांनी त्यांची चित्रे त्यांच्या भाषेत समजून घेणे आवश्यक असल्याचे तांबे यांनी नमूद केले. चित्रकलेच्या माध्यमातून मुलांच्या गुणवत्तेला वाव मिळतो असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण विवेकच्या संपादक डॉ. अर्चना कुडतरकर, साप्ताहिक विवेकच्या शिल्पकार चरित्रकोशाच्या संपादक डॉ. संजीवनी शिंत्रे, पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यवाह सुधीर इनामदार आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या. डॉ. अर्चना कुडतरकर यांनी प्रास्ताविकातून संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली, तर सायली शिगवण यांनी सूत्रसंचालन केले. बालसाहित्य संमेलनाचा प्रारंभ ‘स… संविधानाचा’ या बालनाट्याने झाला. यानंतर ‘कविता मुलांची’ या कार्यक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *