विमान दुर्घटनेचे सत्य समोर यावे:काँग्रेस नेते नाना पटोले यांची राज्य सरकारकडे मागणी




उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमुळे जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे. या घटनेमागील सत्य त्वरित समोर यावे आणि राज्य सरकारने याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. पटोले म्हणाले की, केवळ चौकशीचे आश्वासन पुरेसे नाही. ही चौकशी पारदर्शक, निष्पक्ष आणि कालबद्ध असावी. चौकशीला होणारा विलंब स्वतःच संशय निर्माण करणारा आहे. गुजरातमधील विमान दुर्घटनेचा अहवाल अद्याप आलेला नाही, त्यामुळे अशी दिरंगाई म्हणजे सत्य दडपण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पायलट आणि विमानाची स्थिती याबाबत उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. या सर्व मुद्द्यांची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. कोणाचेही नाव किंवा पद मोठे असले तरी, चौकशीच्या कक्षेबाहेर कोणीही राहू नये, असे पटोले यांनी स्पष्ट केले. पटोले यांनी माध्यमांमधून मिळालेल्या माहितीचा उल्लेख केला. त्यानुसार, पूर्व विदर्भातील एका नेत्याने अजित पवारांच्या फाईलवर सही करण्यासाठी वेळ लावल्याने त्यांना विमानाने प्रवास करावा लागला. गोंदियातील राईस मिल संदर्भातील एका फाईलमुळे त्यांना तातडीने विमान प्रवास करावा लागल्याचेही सांगितले जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील राईस मिल संदर्भातील ती फाईल असल्याने स्थानिक राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे संशयाची सुई जात असल्याचे पटोले म्हणाले. मात्र, या सर्व बाबींचे खरे सत्य केवळ अधिकृत आणि निष्पक्ष चौकशीतूनच समोर येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. पटोले यांनी एपस्टीन फाईल्सचाही उल्लेख करत, अनेक लोकशाही देशांमध्ये केवळ नाव आल्यावरही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले जातात, मात्र भारतात सत्ताधाऱ्यांकडून नैतिक भूमिका घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त केली. लोकशाहीचा विश्वास टिकवण्यासाठी सत्य समोर आणणे आणि जबाबदारांवर कारवाई करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *