दारुच्या वादातून हाणामारी, रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू:पुलगावनजीक विटाळा येथे घडली घटना, आरोपीला अटक




अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दारु पिण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पुलगावनजिकच्या विटाळा येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव अनिल सुखदेव आव्हाड (वय ६८) असून, ते वर्धा जिल्ह्यातील पुलगावच्या गुंजखेडा परिसरातील रहिवासी होते. आव्हाड हे रेल्वे विभागाचे निवृत्त कर्मचारी होते. या घटनेतील आरोपी अमोल समरीत हा त्यांचा मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी अनिल आव्हाड आणि अमोल समरीत हे दोघे विटाळा येथील एका दुकानात दारु पिण्यासाठी गेले होते. तिथे त्यांच्यात दारु पिण्यावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी अमोल समरीतने अनिल आव्हाड यांच्या छातीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अमोल समरीत याच्यावर खुनाचा गुन्हा (कलम ३०२) नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *