![]()
पश्चिम महाराष्ट्रातील निसर्गसमृद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आज ७ फेब्रुवारी रोजी पहाटे एका वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले. ‘STR 06’ असे शासकीय नाव असलेल्या या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणले असून, तिला कोयना वन्यजीव अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सह्याद्रीतील वाटाड्यांनी (गाईड्स) या वाघिणीचे नामकरण ‘हिरकणी’ असे केले आहे. ‘STR 06 या वाघिणीला गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडण्यात आले होते. त्यानंतर रस्तेमार्गे तिची वाहतूक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली. शुक्रवारी रात्री तिला बोटीने प्रवास घडवून कोयना अभयारण्यात आणले गेले. येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची कसून आरोग्य तपासणी केली. प्रवासाचा थकवा असतानाही तिने दिलेले पाणी आणि मटण फस्त केले, जे तिच्या सुदृढ प्रकृतीचे लक्षण मानले गेले. आज शनिवारी सकाळी ६ वाजता सर्व सुरक्षा निकषांचे पालन करून तिला जंगलात मुक्त करण्यात आले. ‘बाजी’ आणि ‘हिरकणी’ची जमणार जोडी कोयना अभयारण्यात आधीच ‘STR 03’ (बाजी) नावाचा एक नर वाघ वास्तव्यास आहे. आता ‘हिरकणी’च्या आगमनामुळे बाजीला जोडीदार मिळाला असून, भविष्यात येथे वाघांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेल्या ११६५ चौ. किमी क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मानले जात आहे. ‘PTR 123’ ते ‘हिरकणी’ या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘PTR 123’ या क्रमांकाने ओळखले जायचे. सह्याद्रीत आल्यावर तिला ‘STR 06’ हा नवीन शासकीय क्रमांक देण्यात आला. मात्र, स्थानिक गाईड मंडळींनी महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमाची आठवण म्हणून तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले आहे. हे संपूर्ण ऑपरेशन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, संग्राम गोडसे, अक्षय साळुंखे, विजय बाटे, तुषार जानकर, अक्षय करमळकर यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे आणि वनपाल, वनरक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली.
सह्याद्रीच्या कुशीत 'हिरकणी'चा संचार:'बाजी'ला मिळाली जोडीदार; पेंचमधून आणलेल्या वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी पुनर्वसन
