अजितदादांच्या अस्थी विसर्जित होण्यापूर्वीच राष्ट्रवादीत गृहयुद्ध:नाशिकमध्ये गटनेतेपदावरून हेमलता पाटील आक्रमक, तटकरेंकडे मागितला खुलासा




उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र अजूनही शोकसागरात बुडालेला असताना आणि त्यांच्या अस्थींचे विसर्जन होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली आहे. नाशिक महानगरपालिकेतील ‘गटनेते’ पदावरून हा वाद उफाळून आला असून, ज्येष्ठ नगरसेविका हेमलता पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही-शिक्यावरच संशय व्यक्त केला आहे. “अजितदादांच्या अस्थी विसर्जित होण्याआधीच इतके घाणेरडे राजकारण होत असेल, तर मला काहीच नको,” अशा शब्दांत त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही नियुक्ती हेमलता पाटील यांना मान्य नाही. त्यांच्या मते, अजित पवार यांनी स्वतः त्यांना गटनेतेपदाचा शब्द दिला होता. सीमा ठाकरे यांच्या नावाची जी अधिकृत पत्रे प्रसिद्ध झाली आहेत, त्यावर हेमलता पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. “सुनील तटकरे यांच्या नावाने कुणी बनावट पत्र, बनावट सही आणि शिक्के मारून हे पत्र दिले आहे का? असा मला दाट संशय आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्वतः या प्रकरणाचा खुलासा करावा आणि मला पुढील आदेश द्यावेत,” अशी मागणी हेमलता पाटील यांनी केली आहे. …तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही अजित पवार यांच्या निधनाला अद्याप आठवडाही पूर्ण झालेला नाही. सध्या त्यांचा अस्थीकलश महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात दर्शनासाठी नेला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांबद्दल बोलताना हेमलता पाटील भावूक झाल्या. “अजितदादांसारखा कर्तृत्ववान नेता आपण गमावला आहे. त्यांच्या मृत्यूचे दुःख अजून ताजे असताना काही लोक जर एवढ्या खालच्या थराचे राजकारण करत असतील, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही,” असे त्यांनी सुनावले. कोण आहेत हेमलता पाटील? हेमलता पाटील नाशिकच्या राजकारणातील एक अनुभवी चेहरा आहेत. त्या ३० ते ३५ वर्षे काँग्रेसमध्ये होत्या आणि त्यांनी सहा टर्म नगरसेवक पद भूषवले आहे. यंदाची त्यांची ही सातवी टर्म आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, दीड महिन्यातच शिंदेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत नवीन समीकरणांची नांदी? अजित पवारांच्या जाण्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पक्षात आता नवीन नेतृत्व आकाराला येत असताना, नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरात जुन्या आणि ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजी पसरणे हे पक्षासाठी चिंतेची बाब ठरू शकते. सीमा ठाकरे यांची नियुक्ती खरंच तटकरे यांनी केली आहे की, स्थानिक पातळीवर काही वेगळ्या हालचाली झाल्या आहेत, हे सुनील तटकरे यांच्या खुलाशानंतरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *