![]()
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या मलंगगडावर आज माघ पौर्णिमेनिमित्त भक्तीचा महापूर लोटला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक मलंगगडाला भेट देऊन मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेच्या वतीने गडावर पारंपरिक पद्धतीने भगवा ध्वज फडकवण्यात आला. ‘जय मच्छिंद्र, जय मलंग’च्या जयघोषाने अवघा परिसर भक्तीमय झाला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मलंगगड यात्रा आजही त्याच जोमाने सुरू आहे. हे केवळ धार्मिक स्थळ नसून लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मलंगगडावरील काही बांधकामाबाबत न्यायालयात प्रलंबीत असलेल्या प्रकरणात लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. रोपवेमुळे भाविकांना दिलासा हिंदुची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट असा जयघोष करीत राज्यभरातून तसेच परराज्यातून लाखो भाविक मलंगनाथाच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल होतात. नाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन् मलंग गडावर नाथांचा जयघोष दुमदुमतो. यावर्षीच्या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे नव्याने सुरू झालेली फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा. या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग भाविकांना गडावर चढणे सुलभ झाले आहे. “राज्यभरातून आणि परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतेय, ही आनंदाची बाब आहे,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मीयांची श्रद्धा कल्याणपासून ११ किमी अंतरावर असलेले मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मीयांच्या आस्थेचे केंद्र आहे. मुस्लिमांसाठी ही १२ व्या शतकातील सुफी संत हाजी अब्दुल रहमान (हाजी मलंग बाबा) यांची दर्गा आहे, तर नाथ संप्रदायाचे अनुयायी याला मच्छिंद्रनाथांचे समाधी स्थळ मानतात. अशा दोन्ही दाव्यांमुळे हा गड नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, दरवर्षी माघ पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेनेसह हिंदु संघटना गडावर उत्सव साजरा करतात. यावेळचा भक्तिमय माहौल सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत असतो. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
मलंगगड यात्रा:जय मच्छिंद्र, जय मलंगच्या घोषणेने मलंगगड दुमदुमला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले मच्छिंद्रनाथाचे दर्शन
