आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत:नीट आंदोलक विद्यार्थ्यांसाठी रितेश-जिनेलिया देशमुखची पोस्ट




‘नीट’ पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता अधिक आक्रमक रूप धारण केले आहे. या आंदोलनाला आता बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. ‘आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत’ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आता कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनेलिया यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून स्टोरी पोस्ट करत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. रितेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आपल्या देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज मोठ्याने, स्पष्टपणे आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे. हे तरुण लोकच आपल्या लोकशाहीचे स्पंदन आणि राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत.” यासोबतच, “चला, आपण त्यांचे ऐकुया, त्यांना पाठिंबा देऊया आणि सक्षम करूया. आपल्या तरुणांची ऊर्जा आणि स्वप्नेच भारताला आकार देतील. जय हिंद!” असे आवाहनही त्याने केले आहे. या पोस्टमध्ये रितेशने #YouthOfIndia, #VoiceOfTheYouth आणि #FutureOfOurNation या हॅशटॅगचा विशेष वापर केला आहे. दिग्गज कलाकार थेट रस्त्यावर, मराठी सेलिब्रिटींचाही पाठिंबा केवळ सोशल मीडियावरच नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांची साथ दिली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसरुद्दीन शाह आणि अभिनेते प्रकाश राज हे थेट दिल्लीतील सोमवारच्या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळाले. याशिवाय, मराठी कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केले आहे. अभिनेते सयाजी शिंदे, गायिका शाल्मली खोलगडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सरकारला “किमान विद्यार्थ्यांचे म्हणणे तरी ऐकून घ्या,” अशी विनंती करत या आंदोलनाला भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. संसदेवरील मार्च आणि पोलिसांशी संघर्ष गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर ‘नीट’ पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी थेट संसदेच्या दिशेने मोर्चा काढला. यावेळी आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट आणि संघर्ष झाला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आंदोलनाचे पडसाद थेट राज्यसभेत रस्त्यावरील या संघर्षाची धग थेट संसदेच्या सभागृहातही पोहोचली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणि पेपरफुटीचा हा गंभीर मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने मोठा गदारोळ झाला आणि अखेर उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. हेही वाचा.. CJPचे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू: समर्थकांनी रात्रीतून पुन्हा स्टेज उभा केला; अभिजीत दीपके म्हणाले- आज पुन्हा संसद मार्च कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP चे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. CJP च्या संसद मार्चनंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जंतर-मंतर रिकामे केले होते. पण, आंदोलक आणि अभिजीत दीपके 6 तासांनंतर पुन्हा परतले. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दीपके यांनी इंडिया टुडेसोबत खास बातचीतमध्ये सांगितले की, ते मंगळवारीही संसद मार्च करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाहीत. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *