![]()
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे विमानाने येत होते, विमान बारामती विमानतळावर लँड होत असतानाच अवघे काही मिनिटांपूर्वी भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या विंनाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. आज बारामती येथे अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. परंतु, काळाने घात केला. अजित पवार हे काम करणारे नेता म्हणून ओळखले जायचे. सकाळी 6 पासूनच अजितदादा आपल्या कामाला सुरुवात करायचे. या अपघातापूर्वी देखील अजित पवारांनी अनेक मोठे निर्णय तसेच काम पूर्ण केल्याचे समोर आले आहे. मुंबईत अजित पवारांनी केलेल्या कामाचा तपशील समोर आला आहे. मुंबईत असले की अजित पवार सकाळी 8.30 वाजता मंत्रालयात येऊन कामकाजाला सुरुवात करायचे. तसेच काल देखील, म्हणजे मंगळवारी सकाळी 8.30 वाजता अजित पवार मंत्रालयात हजर होते. त्यांच्याकडे आलेल्या सर्व फाइल्स त्यांनी क्लियर केल्या. त्यानंतर वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, जीएसटी आयुक्त, एक्साइज आयुक्त यांच्या समवेत या आर्थिक वर्षात राज्याला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा त्यांनी घेतला. उत्पन्न वाढीच्या सूचना सर्व सचिवांना दिल्या. ही बैठक दीड तास चालली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठकीसंदर्भात चर्चा करून ते कॅबिनेट बैठकीला गेले. कॅबिनेट बैठकीनंतर ते पायाभूत सुविधा समिती बैठकीला देखील उपस्थित राहिले. त्यानंतर पुन्हा दालनात गेले. तिथे चंद्रकांत पाटील व त्यांची चर्चा झाली. हे आटोपून ते 2.30 वाजता देवगिरीकडे रवाना झाले. एकंदरीतच यातून हे लक्षात आले असेल की शेवटच्या दिवशी देखील राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठी ते कार्यरत असल्याचे दिसून आले. अजित पवारांचे शेवटचे ट्विट अजित पवारांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाविषयी माहिती देणारे एक ट्विट देखील केले होते. 27 तारखेला दुपारी 3 वाजून 16 मिनिटांना त्यांनी ट्विट केले होते. हे ट्विट त्यांचे शेवटचे ट्विट ठरले आहे.
सर्व फाइल्स क्लियर, महत्त्वाच्या बैठका उरकल्या:शेवटच्या दिवशीही राज्याच्या आर्थिक उत्पन्न वाढीचा विचार; अखेरच्या प्रवासापूर्वी अजित पवारांनी काय केले?
