अपघात की घातपात ?:विमानाचे 2 दिवसांत सुरत-मुंबईदरम्यान 3 वेळा उड्डाण, अपघात असल्याचा डीजीसीएचा दावा, ब्लॅकबाॅक्सद्वारे मुख्य कारण स्पष्ट होणार




अजित पवारांना मुंबईहून बारामतीला पोहोचणाऱ्या विमानाने खराब हवामानामुळे एकदा धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न करुन पुन्हा उड्डाण (गोअराउंड) केले. दुसऱ्यांदाही दृश्यमानता नसल्याने विमानाने एटीसीला संपर्क साधला. एटीसीने सद्सद्विवेकबुद्धीला पटेल तसा निर्णय घेण्याचा सल्ला दिला. धुक्यात धावपट्टी दिसत नसतानाही वैमानिकाने लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र, ते धावपट्टीऐवजी बाजूच्या खड्ड्यात आदळले. या विमानाने गत २ दिवसात सुरत-मुंबईदरम्यान ३ वेळा प्रवास केल्याची बाबही समोर आली आहे. ब्लॅकबॉक्स हाती, डिकोडसाठी किमान ३-४ आठवडे लागणार डीजीसीएने विमानाचा ब्लॅकबॉक्स जप्त केलाय. केशरी रंगाचे ब्लॅकबॉक्स टिटेनियम धातूपासुन तयार होतात. त्याचे दोन भाग असतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाचा वेग, दिशा, इंधन पातळी समजते. तर कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये कॉकपिटमधील वैमानिकांचे संभाषण रेकॉर्ड होते. हा डेटा डिकोड करण्यासाठी ३ ते ४ आठवड्यांचा वेळ लागतो. याआधी विमान कंपनीला केवळ तंबी ‘लिअरजेट ४५’ विमानाला १४ सप्टेंबर २०२३ ला मंुबई विमानतळावर असाच अपघात झाला होता. पहिल्यांदा लँड न करता आल्याने विमानाने गोअराउंड केले होते. दुसऱ्या प्रयत्नात पाऊस -वाऱ्यामुळे ते धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने ६ प्रवासी व २ क्रू मेंबर बचावले. तेव्हा डीजीसीएने फक्त तंबी देऊन कंपनीला सोडले. कडक कारवाई केली असती तर ही दुर्घटना टळली असती. १ कोटी दंड, परवाना रद्द होऊ शकतो अपघाताची एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने चौकशी सुरू केली आहे. एअरक्राफ्ट ॲक्ट १९३४ आणि एअरक्राफ्ट रूल्स १९३७ अन्वये ऑपरेटर कंपनीवर एक कोटीचा दंड, २ वर्षे शिक्षा आणि ऑपरेटरचा परवाना रद्दची तरतूद आहे. गुन्ह्याचे स्वरूप पाहून वैमानिकाचा ३ महिने ते कायमस्वरूपी परवाना रद्द करता येतो. ऑडिटमध्ये विमानाला अनुकूल शेरा डीजीसीएने या विमानाचे अखेरचे ऑडिट फेब्रुवारी २०२५ मध्ये झाले. त्यात विमानात सर्वकाही नीट असल्याचा शेरा देण्यात आला. विमानाला सप्टेंबर २०२५ मध्ये एअर वर्थीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट देण्यात आले. ते सप्टेंबर २०२६ पर्यंत वैध राहणार होते. दोनऐवजी एकच कॅप्टन उपस्थित व्हीआयपी फ्लाइटसाठी २ कॅप्टन आणि १ फर्स्ट ऑफिसर आवश्यक असतात. येथे १ कॅप्टन आणि १ फर्स्ट ऑफिसर होता. पैकी कॅप्टन सुमीत कपूर यांना १६ हजार तासांचा तर शांभवी पाठक हिला १५०० तास उड्डाणांचा अनुभव होता. टेबलटॉप रनवे…अपुरी सुविधा नडली बारामतीला अनकंट्रोल्ड विमानतळ असून येथे टेबल टॉप रनवे आहे. असे रनवे शक्यतो डोंगराळ किंवा उंच भागात असतात. याच्या दोन्ही बाजूंनी उतार असल्याने थोडी चूकही महागात पडते. येथे धुक्याच्या वेळी रनवे स्पष्ट दिसण्यासाठी असणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमही नाही.
लँडिंगसाठी गोअराउंड ठरले अखेरचे विमानाने दृश्यमानता नसल्याने एकदा गोअराउंड केल्यामुळे हा अपघात झाल्याचे डीजीसीए सांगते. प्रत्यक्षदर्शीनुसार विमानाला दुसऱ्यांदा उतरताना अपघात झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही हा अपघात असून यात राजकारण करू नये, असे एका संदेशात म्हटले. वर्षभरापूर्वी विमानाची तपासणी अपघातग्रस्त विमानाची २०१० मध्ये निर्मिती झाली. २०१४ मध्ये त्यास उड्डानाचा परवाना मिळाला. एप्रिल २०२३ ला नूतनीकरणानंतर तो एप्रिल २०२८ पर्यंत वैध आहे. अखेरचे ऑडिट फेब्रुवारी २०२५ मध्ये झाले. दिल्लीतील कंपनी, १७ विमानांचा ताफा कॅप्टन व्ही.के. सिंग यांच्या मालकीच्या व्हीएसआर एव्हिएशनचे मुख्यालय दिल्लीत असून मुंबई, भोपाळ, हैदराबादला बेस स्टेशन आहे. १५ वर्षांपासुन कार्यरत कंपनीकडे १७ विमाने, ६० पायलट आहेत. परवाना आहे. अपघात झालेल्या दोन इंजिनच्या लिअरजेट विमानाविषयी… लिअरजेट ४५ लहान आकाराचे विमान असून व्हीआयपी व लहान प्रवासासाठी वापरले जाते. प्रवासी क्षमता ६ ते ८ प्रवासी आहे. दोन इंजिनचे विमान कॅनडाची बांबांर्डिएन कंपनी तयार करते. लांबी १७.६८ मी, उंची ४.३० मी तर पंख्यांची लांबी १४.५८ मीटर आहे. विमाने ५१ हजार फुटांपर्यंत उडू शकते. तर इंडिगो, ट्रूजेटसारखी विमाने ४१ हजार फूट उडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *