शरद पवारांच्या NCP मध्ये मोठा स्फोट, अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर:जिल्हा सरचिटणीसांचा राजीनामा, खासदारांवर थेट आरोप




बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने नाराजीचा सूर आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. स्वतः खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रचारात उतरून प्रतिष्ठा पणाला लावली होती, तरीही पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट पक्षातील कारभारावर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. देवराव लुगडे यांनी राजीनामा देताना पक्षात दलालांचा कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे. पक्ष संघटनाऐवजी निवडणुकीच्या काळात सुपारीबाज आणि संधीसाधू लोकांना महत्त्व दिले जात असल्यामुळे आपण कंटाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांऐवजी दलाल प्रवृत्तीच्या लोकांचा प्रभाव वाढला आहे. अशा वातावरणात काम करणे शक्य नाही, असे सांगत त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या मते, खासदारांच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे परळी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. लुगडे यांनी या आधीही पक्षाच्या वरिष्ठांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. विकासपुरुष म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा असलेला मोठा वर्ग आजही पक्षासोबत असताना, स्थानिक पातळीवर चुकीची धोरणे राबवली जात असल्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण खासदार बजरंग सोनवणे यांना व्हिडिओ कॉल करून तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोपही लुगडे यांनी केला आहे. या दुर्लक्षामुळेच आपल्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले. शरद पवार गटातील धुसफूस वाढली दरम्यान, परळी नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाने शरद पवार गटातील धुसफूस अधिकच वाढली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असून, पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. परळी हा मतदारसंघ पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात असताना, अशा ठिकाणी पराभव होणे ही गंभीर बाब असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच देवराव लुगडे यांच्या राजीनाम्याने केवळ जिल्हा पातळीवर नव्हे, तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर उघड टीका देवराव लुगडे यांनी याआधीही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर उघड टीका केली होती. पक्ष संघटन, उमेदवार निवड आणि भांडवलदारांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याबाबत त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले होते. या भागात पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका, असे सांगत त्यांनी सोनवणे यांना थेट इशारा दिला होता. येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरी प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. निवडणुकीच्या वेळी दलाल आणि श्रीमंत लोकांना पुढे केलं जात लुगडे यांनी आपल्या वक्तव्यात कार्यकर्त्यांच्या भावना ठळकपणे मांडल्या होत्या. अडचणीच्या काळात आम्ही पक्ष वाढवायचा, लोकांमध्ये जायचं, आंदोलन करायची, अंगावर खोटे गुन्हे घ्यायचे, हेच आमचं काम. मात्र निवडणुकीच्या वेळी दलाल आणि श्रीमंत लोकांना पुढे केलं जात असेल, तर कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होतो, असे ते म्हणाले होते. पक्षावर हा भांडवलदारांचा आणि श्रीमंतांचा पक्ष आहे, अशी छाप पडू नये, अशी त्यांची ठाम भूमिका होती. हा पक्ष पवार साहेबांच्या विचारांचा असून, चाटुगिरी आणि पुढे-पुढे करणाऱ्यांना प्राधान्य देऊ नये, असे खडेबोल त्यांनी सुनावले होते. संघटनात्मक बांधणीवरही प्रश्नचिन्ह आता देवराव लुगडे यांच्या राजीनाम्यानंतर आणि आरोपांनंतर खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळी नगरपरिषद पराभवाने सुरू झालेला हा वाद केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित न राहता, शरद पवार गटातील संघटनात्मक बांधणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. येणाऱ्या काळात पक्ष नेतृत्व या अंतर्गत नाराजीवर कसा तोडगा काढते आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कसा पुन्हा मिळवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *