फुलंब्रीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा राडा!:खासदार कल्याण काळेंच्या कार्यालयावर चढवला हल्ला; निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप




जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून फुलंब्रीमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत धुसफूस उफाळून आली असून, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला लक्ष्य केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा गंभीर आरोप करत आक्रमक कार्यकर्त्यांनी कार्यालयात शिरून फर्निचरची मोठी तोडफोड केली आणि जोरदार घोषणाबाजी करत राडा केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत भरदिवसा घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. तिकीट वाटपातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक, हेच कार्यकर्त्यांच्या या तीव्र संतापाचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. पाल जिल्हा परिषद गटातून माजी युवक काँग्रेस अध्यक्ष वरुण पाथ्रीकर यांच्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला डावलून शेवटच्या क्षणी ज्ञानेश्वर जाधव यांना संधी देण्यात आल्याने, तसेच बाबरा गटात अजिनाथ सोनवणे यांना आश्वासन देऊनही ऐनवेळी डावलल्याने कार्यकर्त्यांच्या संयमाचा बांध सुटला. “पैसे घेऊन उमेदवारी विकली जात असून हे काँग्रेस पक्ष संपवण्याचे कारस्थान आहे,” असा थेट आणि गंभीर आरोप करत कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. दुपारी तीनच्या सुमारास शेकडो संतप्त कार्यकर्ते अचानक खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयात घुसले आणि त्यांनी तिथे प्रचंड धुमाकूळ घातला. केवळ घोषणाबाजीवरच न थांबता या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या, टेबल आणि फर्निचरची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली. या गोंधळादरम्यान खासदारांचे बंधू जगन्नाथ काळे आणि तालुकाध्यक्ष संतोष मेटे यांना आंदोलकांनी तब्बल अर्धा तास घेराव घालून तिकीट वाटपावरून जाब विचारला. कार्यालयातील परिस्थिती अत्यंत गंभीर आणि हिंसक बनल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेल्या विश्वास औताडे यांनी प्रसंगावधान राखत तिथून तातडीने पळ काढला. निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली असून, उघड झालेली गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील तीव्र असंतोष याचा थेट फटका मतदानावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केवळ फुलंब्रीच नव्हे, तर निधोना पंचायत समिती गणातील नाराजीही आता पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते या वादावर कशा प्रकारे पडदा टाकतात आणि ऐन निवडणुकीत उफाळून आलेली ही बंडखोरी रोखण्यात त्यांना कितपत यश येते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *