ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी?:भाषणात बाबासाहेबांचे नाव घेण्याचे अनावधानाने राहिले; गिरीश महाजनांची प्रतिक्रिया




प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा थेट सवाल करत महाजन यांना जाहीरपणे टोकल्याने सोहळ्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाजन यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी केल्याने हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. त्यात आता गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढा गदारोळ कशासाठी? गिरीश महाजन म्हणाले, आज घडलेल्या प्रकारामुळे मला खूप वाईट वाटले आहे. मी गेल्या 40 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे, पण आजवर कधीहीह असा प्रसंग आला नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलो असलो तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मी कायम आदरच केला आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा आम्हीच उभा केलाय. भाषणात नाव घेण्याचे अनावधानाने राहिले असेल, पण त्यावरून एवढा गदारोळ कशासाठी? मी याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी? प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ॲट्रॉसिटीच्या मागणीवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी? समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मी मातंग समाज असो वा वाल्मीक समाज, त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होतो. लग्नात जातो, दलित वस्तीत पंगती देतो आणि स्वतः त्यांच्यासोबत जेवायला बसतो. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात मी निळा शर्ट घातला नाही किंवा समाजाचा सन्मान केला नाही, असे कधीच घडले नाही. तसेच अधिकारी माधवी जाधव यांच्याविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मला माहित नाही त्या भगिनी कोण आहेत. भुसावळमध्येही विकासकामांसाठी मी कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना जळगावातून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा गिरीश महाजनांना बाबासाहेबांचे नाव न घेणे भोवणार:आंबेडकरांची अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी; महिला अधिकाऱ्याशी संवाद वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांचे कृत्य अ‍ॅॅट्रोसिटीचा गुन्हा आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः यासंबंधीचा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडेन, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *