![]()
जानोरी गावातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करत फुलशेतीमध्ये जागतिक दर्जाचे यश संपादन केले आहे. येथील शेतकरी सुमारे २०० एकर शेतीवर प्रामुख्याने गुलाब, जर्बेरा, कार्नेशन आणि ग्लॅडिओलस यांसारख्या विदेशी फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. ‘पॉलिहाऊस’ तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेली ही फुले केवळ मुंबई, पुणे किंवा दिल्लीच नाही, तर दुबई, लंडन आणि नेदरलँडसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही निर्यात केली जात आहेत. गुणवत्तेमुळे व सातत्यपूर्ण पुरवठ्यामुळे या गावाला फुलांचे गाव म्हणून नवी ओळख मिळाली आहे. जानोरीचे मॉडेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी क्षेत्रात आणि वाघाड पाणीवापर महासंघाच्या नियोजनामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून कशाप्रकारे कोट्यवधींची उलाढाल करता येते, हे जानोरीकरांनी सिद्ध करून दाखवले आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत फुलशेतीकडे वळल्यामुळे जानोरीतील शेतकऱ्यांच्या राहणीमानात मोठा बदल झाला आहे. या उद्योगामुळे गावातील तरुणांना स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असून, महिला मजुरांनाही वर्षभर काम मिळत आहे.
जानोरीत 200 एकरवर फुलली गुलाबाची शेती:‘पॉलिहाऊस''चा वापर करून गुलाब, जर्बेरा व ग्लॅडिओलस विदेशी फुलांचे उत्पादन
