भ्रष्टयुतीच्या सरकारला कवडीची लाज उरली नाही:कृषी अधिकाऱ्याची शेतकऱ्याला बुटाने मारहाण, काँग्रेसचा वाशिमच्या घटनेवर तीव्र संताप




संत्रा फळबागेच्या रखडलेल्या अनुदानाचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने चक्क बुटाने मारहाण केल्याची संतापजनक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व आमदार नाना पटोले यांनी या घटनेवर तीव्र संताप करत महायुती सरकारमध्ये काडीचीही लाज शिल्लक नसल्याचा आरोप केला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे ही घटना घडली आहे. येथील ऋषिकेशी पवार नामक शेतकऱ्याने 2 वर्षांपूर्वी मनरेगा योजनेंतर्गत 3 एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान मागील 4 महिन्यांपासून रखडले आहे. पवार यांनी याविषयी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना जाब विचारला. यावेळी व्हिडिओ काढण्यावरून वाद झाला आणि कांबळे यांनी पवार यांना थेट बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केली. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली आहे. या घटनेवर शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सरकारमध्ये कवडीची लाज उरली नाही -सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत महायुती सरकारमध्ये कवडीचीही लाज उरली नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, या भ्रष्टयुतीच्या सरकारमध्ये कवडीची ही लाज उरलेली नाही, तीच स्थिती यांच्या वरपासून खालपर्यंतच्या सरकारी बाबूंची आज आहे. शेतकऱ्याला सरकारकडून मिळणारे हक्काचे अनुदान चार महिन्यांपासून रखडलंय. याबद्दल तालूका कृषी अधिकारी पाहणीवर आले, त्यांना अनुदानाबद्दल विचारणा केली असता ऋषिकेश माने या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केली. याच शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्याला बुटाने मारहाण केली असती तर…. या मुजोर अधिकारी व यांचे मंत्रालयातील एसी रुम्समध्ये खुर्च्या उबवणारे मंत्रीमहोदय यांनी लक्षात ठेवावे शेतकऱ्यांना एवढंही गृहीत धरू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला जीव हातात घेऊन स्वतःचं रक्षण करावं लागेल, असे ते म्हणाले. फडणवीस सरकार शेतकरीविरोधी -नाना पटोले काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्याचे कृषिमंत्री म्हणतात, भिकारी सुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही, पण एक रुपयात विमा सरकार देते; दुसरे आमदार म्हणतात, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल आम्ही देतो आणि मुजोर सरकारी अधिकारी शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जात बुटाने मारहाण करतात. वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेअंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला झालेली मारहाण ही अत्यंत संतापजनक घटना आहे. हा संपूर्ण शेतकरी वर्गाच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला नाना पटोले या घटनेची सविस्तर माहिती देताना म्हणाले, मंगळूरपीर येथील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेला असता, पवार या शेतकरी बांधवाने त्यांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली. मात्र जाब विचारण्याऐवजी संबंधित कृषी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली तसेच शेतातील मातीची ढेकळे उचलून त्याच्यावर फेकली. इतक्यावरच न थांबता या मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला “तुला गुन्ह्यात अडकवीन” अशी धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना संपूर्ण शेतकरी वर्गाच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला आहे. या राज्यात शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, असा गंभीर प्रश्न आज निर्माण झाला आहे. एकीकडे अस्मानी संकट, दुसरीकडे सुलतानी संकट आणि त्यात भर म्हणून प्रशासनातील काही मुजोर अधिकाऱ्यांची अरेरावी या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. कृषीप्रधान भारत देशात जर शेतकऱ्यांना अशी अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत असेल तर शेतकऱ्यांनी न्यायासाठी जायचे तरी कुठे, हा प्रश्न उपस्थित होतो. या अन्यायकारी अन्नदात्याविरोधी फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो. या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *