Ajit Pawar Irrigation Scam Row; BJP-Shiv Sena Alliance Accused | भाजप-शिवसेना युती सरकारची‘पार्टी फंड’साठी 100 कोटी रुपयांची मागणी: अजित पवारांचा मोठा दावा; एकनाथ खडसेंचा पलटवार – Mumbai News



गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सिंचन घोटाळा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. विशेषतः भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सातत्याने टीका होत आली आहे. मात्र आता पाल

.

पालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी थेट भूतकाळातले आरोप केले. त्यांनी सांगितले की, 1999 साली राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर जलसंपदा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. त्या काळात पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल त्यांच्या टेबलावर आली. या फाईलमध्ये प्रकल्पाची अंदाजित किंमत 310 कोटी रुपये दाखवण्यात आली होती. मात्र, ही रक्कम पाहून आपल्यालाच धक्का बसल्याचे अजित पवारांनी सांगितले.

अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या खर्चाबाबत थेट विचारणा केली. तेव्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कबुली दिली की, या प्रकल्पाची मूळ किंमत फक्त 200 कोटी रुपये होती. मात्र, 1999 पूर्वी सत्तेत असलेल्या सरकारच्या काळातच प्रकल्पाच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली. अजित पवारांनी आरोप केला की, त्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारने ‘पार्टी फंड’साठी 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्याचवेळी काही अधिकाऱ्यांनीही स्वतःसाठी 10 कोटी रुपये जोडले आणि 200 कोटींचा प्रकल्प थेट 310 कोटींवर नेण्यात आला.

या आरोपांमुळे सिंचन घोटाळ्याच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या संपूर्ण व्यवहाराची फाईल आजही आपल्याकडे आहे. ती फाईल जर त्या वेळी बाहेर काढली असती, तर राज्यात हाहाकार माजला असता, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, त्या काळात सिंचन खातं भाजपकडे होतं, याकडे लक्ष वेधत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेतृत्वावरच बोट दाखवलं आहे.

इतकी गंभीर माहिती 25 वर्षे का दडवून ठेवली? – एकनाथ खडसे

अजित पवारांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. खडसे म्हणाले की, 1999 साली मी स्वतः अर्थमंत्री होतो. त्या कालखंडात अशा स्वरूपाचा कोणताही निर्णय झाल्याचं मला आठवत नाही. त्यांनी अजित पवारांच्या दाव्यांवर शंका उपस्थित करत, जर इतकी गंभीर माहिती अजित पवारांकडे होती, तर ती त्यांनी 25 वर्षे का दडवून ठेवली? असा थेट सवाल केला.

राजकीय संघर्ष अधिक तीव्र

या आरोप-प्रत्यारोपांमुळे सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपकडून याआधी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांवर सिंचन प्रकल्पांतील भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. मात्र, आता अजित पवारांनीच उलट भाजप-सेना युती सरकारच्या काळातच खर्चवाढ आणि कथित भ्रष्टाचार झाल्याचा दावा केल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप केवळ प्रचारापुरते मर्यादित राहतात की पुढे चौकशीची मागणी होते, याकडे लक्ष लागले आहे.

वाद आणखी चिघळण्याची शक्यता

पालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सिंचन घोटाळ्यासारखा जुना पण संवेदनशील मुद्दा पुन्हा समोर आल्याने मतदारांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांचे दावे, खडसेंचे प्रतिप्रश्न आणि भाजपची पुढील भूमिका यामुळे येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एकीकडे विकास, स्थानिक प्रश्न आणि नागरी सुविधांवर निवडणूक लढवली जात असताना, दुसरीकडे जुन्या घोटाळ्यांचे आरोप-प्रत्यारोप राजकीय वातावरण अधिक तापवत आहेत. आता या आरोपांवर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते आणि अजित पवार आपल्या कथित फाईलबाबत पुढे काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *