![]()
महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असला तरी राजकीय नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला भाजप आमदार महेश लांडगे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देताना, महाराष्ट्राच्या ‘दादां’ना आता
.
महेश लांडगे म्हणाले, अजित पवारांनी योग्यवेळी पालकत्व स्वीकारले असते तर आज उत्तरदायित्व मागायची वेळ आली नसती. तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही सहन करणार असे होणार नाही. त्यांनी वैयक्तिक टीका का केली ते मला कळत नाही. राजकारण करत असताना अनेक लोक सरेंडर होतात, पण मी स्वाभिमानी आहे. मी जेव्हापासून त्यांना सोडले तेव्हापासून त्यांच्याकडे एकही काम घेऊन गेलो नाही.
मी आमच्या लोकांच्या समस्या ओळखतो. काल काही लोकांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आम्ही पाणी आणले, पाइपलाईन केली. पण पवना जलवाहिनी का बंद झाली याबाबत का चौकशी केली नाही? असा सवाल महेश लांडगे यांनी उपस्थित केला. तसेच याच महाराष्ट्राच्या दादांनी शेतकऱ्यांना त्यावेळी उत्तर दिले होते की धरणात पाणी नाही तर काय करू? आम्ही कधी असे लोकांना म्हटले नाही की धरणात पाणी नाही तर आम्ही काय करू? पाण्यासाठी आम्ही शहरात सगळी कामे केली आहेत. आम्ही 5 वर्षात काय केले हेच सांगत आहोत, असे म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या जाहीरनाम्यावर टीका केली.
महेश लांडगे म्हणाले की, आमच्या जाहिरनाम्याबद्दल दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत आहेत. आमची आश्वासने पूर्ण करणे शक्य नाही, ती अवास्तव आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. पण आमची आश्वासने व्यवहार्य आहेत. आम्ही घेतलेले निर्णय घाईने घेतलेले नाहीत. आम्ही लोकांमधे जाऊन सर्वेक्षण केलंय, लोकांची मते जाणून घेतली आहेत आणि मगच हा निर्णय घेतला आहे.
आपली महापालिका ही पूर्ण राज्यात चर्चेची झाली, ही चर्चा का झाली, कुणामुळं झाली सगळ्यांना माहिती आहे. 2017 मध्ये बहुमताने भाजप निवडून आली. त्यानंतर आपल्या शहराला गती देण्याचे काम आम्ही केले. देवेंद्र फडणवीस याचे मार्गदर्शन आम्हाला होते. राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. राज्य सरकारच्या योजना आम्ही पूर्णपणे शहरात राबविल्या. याच आधारावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे महेश लांडगे म्हणाले.
