![]()
आज भाजप पक्षाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. ‘
.
जयंत पाटील म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करुन सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे. मात्र आज भाजप काय करतेय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपमध्ये नेले आहेत. आता आपले गडी देखील तिथे चाललेत. काँग्रेस सर्व धर्मभावाचा विचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. मात्र दुर्दैवाने ती परिस्थिती नाही.
भाजपवाले ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात एमआयएम सोबत युती करतात. ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे.
ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा
व्यक्तीला मतदान करा. साध्या मनाची, सुशिक्षित उमेदवार आम्ही दिले आहेत. ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा. विचाराच्या मागे सांगली राहते हे दाखवण्याची हीच वेळ आहे, असे म्हणत जयंत पाटलांनी मतदारांना आवाहन केले आहे. तसेच नवा पर्याय म्हणून सांगलीकर या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला स्वीकारतील, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.
