Police Arrest Five Extortionists South Indian Thriller Inspiration | 50 लाखांच्या खंडणीसाठी दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेरणा: भंडारा भूमी अभिलेख कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यासह 5 आरोपी अटकेत – Nagpur News



दाक्षिणात्य थ्रिलर चित्रपटांमधून प्रेरणा घेऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. बेलतरोडी पोलिसांनी ही कारवाई करत खंडणीचा कट उधळू

.

या प्रकरणातील तक्रारदार प्रकाश ढगे हे भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक आहेत. १७ डिसेंबर २०२५ रोजी ते भंडाऱ्याहून नागपूरकडे परत येत असताना वेळाहरी बायपास रोडवर आरोपींनी त्यांची कार अडवली. कारच्या मागील आणि समोरील दरवाज्याच्या काचा फोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर १९ डिसेंबर २०२५ रोजी ढगे यांना अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला.

फोनवरील आरोपींनी ढगे यांना, “तुम्हाला मारण्यासाठी २० लाखांची सुपारी देण्यात आली आहे. जीव वाचवायचा असेल तर ५० लाख रुपये द्या,” अशी धमकी दिली. आरोपींनी जबलपूर रिंगरोडवरील महादेव ढाब्यावर पैसे आणण्यास सांगितले. ढगे यांनी तात्काळ बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून बनावट नोटांनी भरलेली बॅग ढगे यांच्याकडे देऊन त्यांना ठरलेल्या ठिकाणी पाठवले. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी बॅग घेऊन पसार झाले.

या घटनेनंतर आरोपींनी सतत सिमकार्ड आणि मोबाईल फोन बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पैसे आणण्यास सांगण्यास सुरुवात केली. २९ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा धमकीचा फोन करून ढगे आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत छापे टाकून पोलिसांनी अखेर सर्व आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतुल अनिल तागडे (वय ३०, रा. देवरी, गोंदिया), राहुल मीताराम पटले (वय २१), हिंदुस्तान वासुदेव रामटेके (वय २७), निखिल राजू नांदेकर (वय २८) आणि प्रेक्षा बाबू कांबळे (वय ३०) यांचा समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल तागडे हा देवरी येथे मोबाईल शॉपी चालवतो. तो बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. प्रेक्षा कांबळे ही त्याची मावस बहीण असून ती भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहे. ‘विक्रम’ आणि ‘शिवाजी द बॉस’ यांसारख्या दाक्षिणात्य थ्रिलर चित्रपटांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी हा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *