मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे:रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, कर्जमाफीपासून 'ऑपरेशन टायगर'पर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या कामकाजावर टीका करणे हा लोकशाहीतील विरोधकांचा अधिकार असून, त्याचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कर्जमाफी, निकृष्ट दर्जाची विकासकामे, अजित पवारांच्या अपघाताची चौकशी, पिंपरी-चिंचवड दुर्घटना तसेच ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेसह अनेक मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले. रोहित पवार म्हणाले की, सरकारने बाहेरील कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणावर कामे दिली असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांनीच व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे. विरोधकांनी तोच मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. अशा टीकेला महाराष्ट्राचा अपमान म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी वापरलेल्या ‘भाड्याचे टट्टू’ या शब्दावरही रोहित पवारांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री हे अभ्यासू आणि अनुभवी नेते आहेत. त्यामुळे अशा प्रकारची भाषा त्यांच्या पदाला शोभणारी नसल्याचे ते म्हणाले. लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करणे हा विरोधकांचा अधिकार असून त्याला अशा शब्दांत उत्तर देणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘महापुरुषांच्या अपमानावेळी महाराष्ट्राचा अपमान नव्हता का?’ रोहित पवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये झाली, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाला नव्हता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोयीप्रमाणे भूमिका घेणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. नगरपरिषद राजकारणावर प्रतिक्रिया एका नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, स्थानिक नगरसेवकांनी परिस्थितीनुसार निर्णय घेतला आहे. संबंधित अध्यक्ष भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नसल्याने त्या स्थानिक राजकारणावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टरांना मारहाण प्रकरणात सरकारवर आरोप डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवकाविरोधात कारवाई करण्यास पोलिसांनी विलंब केल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित नगरसेवकावर अनेक गुन्हे असूनही त्याला संरक्षण मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. अटक झाल्यानंतर आजारी असल्याचे कारण सांगून रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख करत, डॉक्टरांनी वस्तुनिष्ठ वैद्यकीय अहवाल द्यावा आणि आरोपीला तातडीने कारागृहात पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली. मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर टीका उद्योगमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या ‘भारताची ओळख स्टार्टअपमुळे आहे, शेतीमुळे नाही’ या कथित वक्तव्यावरही रोहित पवार यांनी टीका केली. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांमुळेच देशाची अन्नसुरक्षा टिकून आहे. स्टार्टअप क्षेत्र महत्त्वाचे असले तरी शेतीचे योगदान नाकारता येणार नाही, असे ते म्हणाले. अजित पवारांच्या अपघाताची CBI किंवा न्यायालयीन चौकशी करा अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीचा मुद्दाही रोहित पवार यांनी पुन्हा उपस्थित केला. अधिवेशनात आश्वासन देऊनही सरकारने चौकशीबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. CBI चौकशी होत नसेल तर न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. 28 जुलै रोजी या प्रकरणातील नव्या पुराव्यांसह पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा त्यांच्या अपघाताच्या चौकशीला प्राधान्य दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. पुणे रिंगरोडला त्यांचे नाव देणे, स्मारक उभारणे अशा मागण्यांपेक्षा सत्य बाहेर येणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी कर्जमाफीवर सरकारला इशारा राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेवरही रोहित पवार यांनी टीका केली. ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी नसून ‘कर्जवसुली योजना’ ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. योजनेतील 2025-26 आणि 2026-27 या आर्थिक वर्षांशी संबंधित अटी रद्द करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पिंपरी-चिंचवड दुर्घटनेवर प्रश्नचिन्ह पिंपरी-चिंचवडमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याच्या घटनेवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. संबंधित ठिकाणी पालकमंत्र्यांनी तातडीने भेट दिली नसल्याची टीका करत, या कचरा व्यवस्थापनाचा ठेका कोणाला दिला, त्यामागे कोण आहे आणि निकृष्ट कामासाठी जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर पूर्णविराम राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरही रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोणत्याही परिस्थितीत एनडीएमध्ये जाणार नाही किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी पक्ष संघर्ष करत राहील आणि या सर्व केवळ अफवा असल्याचा दावा त्यांनी केला. संजय राऊतांच्या टीकेवरही प्रतिक्रिया संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील भेटीवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, रोहित पवार म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधानभवन परिसरात आले होते. त्यावेळी काही आमदारांशी चर्चा करण्यासाठी जवळच्या कार्यालयात गेले. एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री असून त्यांच्या पदाचा सन्मान राखून शरद पवार यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला. या घटनेकडे राजकीय नव्हे तर परंपरा आणि सभ्य राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी दावा केला की, या अधिवेशनातून सामान्य नागरिक, शेतकरी आणि कामगारांच्या हातात काहीही लागले नाही. सरकारने सर्वसामान्यांना न्याय देण्यात अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला. हेही वाचा… पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शालेय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा?:संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; उच्चस्तरीय चौकशीची मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावेही जोडले आहेत. “न खाऊंगा, न खाने दूंगा, हे पंतप्रधानांचे वाक्य प्रेरणादायी आहे, पण या व्यवहारात तुमच्याच मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने पालिकेवर दबाव आणून ५० ते ५५ कोटी रुपयांची टक्केवारी खाल्ली आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी या पत्रात केला आहे. या प्रकरणावर कारवाई झाली तरच नवल वाटेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी शरद पवारांचे 5-6 खासदार अस्वस्थ:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ! खासदार बजरंग सोनवणे आणि शशिकांत शिंदेंनी दिलं थेट उत्तर राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही,” असे विधान चव्हाण यांनी केले आहे. या दाव्यामुळे महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक 8 जागा जिंकल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत, ज्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *