![]()
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. कुख्यात गुंड नीलेश घायवाळ प्रकरणातील गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर करण्यात आ
.
पुण्यातील गुन्हेगारी आणि टोळीयुद्ध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नीलेश घायवाळ या कुख्यात गुंडाशी संबंधित काही गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई सुरू असताना, त्यांना देशाबाहेर पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी रसद पुरवली आणि राजकीय दबावाचा वापर करून मदत केली, असा खळबळजनक आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. गुन्हेगारांना कायदेशीर कचाट्यातून वाचवण्यासाठी मोहोळ यांनी आपले वजन वापरले आणि त्यांना विदेशात सुरक्षित स्थळी धाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे या आरोपांचे स्वरूप आहे. निवडणुकीच्या काळात हा मुद्दा समोर आल्याने मोहोळ यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.
आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी संन्यास घ्यावा
या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, निवडणूक जवळ आली की अशा प्रकारचे बिनबुडाचे आणि खालच्या पातळीवरचे आरोप करणे ही विरोधकांची पद्धत झाली आहे. मी कोणत्याही गुन्हेगाराला कधीही मदत केलेली नाही. ज्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहेत, त्यांना मी जाहीर आव्हान देतो की त्यांनी पुरावे समोर आणावेत. जर हे आरोप खरे ठरले तर मी राजकारणातून कायमची एक्झिट घेईन. मात्र, जर आरोप खोटे ठरले तर ज्यांनी हे आरोप केले आहेत, त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची हिंमत दाखवावी, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
एकाच व्यासपीठावर चर्चेचे आव्हान
मुद्दयाचे राजकारण करण्याऐवजी विरोधक वैयक्तिक चिखलफेक करत असल्याचे सांगत मोहोळ यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मी कोणत्याही व्यासपीठावर यायला तयार आहे. विरोधकांनी समोरासमोर येऊन बोलावे आणि पुराव्यानिशी चर्चा करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आव्हानामुळे आता विरोधक यावर काय भूमिका घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून पुण्याचे राजकारण आता अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
