अनियंत्रित ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली:पेट्रोलपंप जलमय, अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट




गुरुवारी सकाळी नांदगाव पेठ येथील अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ एका अनियंत्रित ट्रकच्या धडकेने अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट निर्माण झाले आहे. सकाळी साडेनऊ वाजता डिझेल भरण्यासाठी येत असलेल्या यूपी ७८ डीटी ४५७७ क्रमांकाच्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट मुख्य जलवाहिनीवर आदळला. या जोरदार धडकेमुळे जलवाहिनी फुटून सुमारे ५० फूट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडू लागले, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे काही वेळातच पेट्रोलपंप परिसर आणि आजूबाजूचा भाग पूर्णपणे जलमय झाला. अपघातात ट्रकने दोन दुचाकी आणि पेट्रोलपंपावरील जनरेटरलाही धडक दिली, यात त्यांचे मोठे नुकसान झाले. जवळच्या एका टायर रिमोल्डिंगच्या दुकानात पाणी शिरल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेजारील हॉटेललाही आर्थिक फटका बसला. पेट्रोलपंपाच्या जमिनीखालील इंधन टाक्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याने व्यवस्थापनाने खबरदारी म्हणून इंधन विक्री तात्पुरती बंद केली. या घटनेमुळे आधीच दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा सहन करणाऱ्या अमरावतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मुख्य जलवाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा एक ते दोन दिवस विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. गुरुवारी रात्रीनंतर दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अग्रवाल ऑटो सर्व्हिसचे संचालक आझाद अग्रवाल यांनी सांगितले की, ग्राहकांची सुरक्षितता आणि इंधनाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी इंधन विक्री तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. पेट्रोलपंपाच्या भूमिगत टाक्यांची आणि इंधनाची आवश्यक शहानिशा पूर्ण झाल्यानंतरच इंधन विक्री पुन्हा सुरू केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *