Devendra Fadnavis Pulls Up Pune BJP Leaders Over ‘Mission 125’ Hurdle | देवेंद्र फडणवीसांकडून बड्या नेत्यांना कानउघडणी: कात्रज सभेनंतर बंद दाराआड खलबतं, पुण्यात भाजपची रणनीती बदलणार; राष्ट्रवादीशी संघर्ष – Pune News



राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच दुसरीकडे प्रचाराच्या मैदानात राष्ट्रव

.

भाजपकडून पुणे महापालिकेत 125 जागा जिंकण्याचं लक्ष्य जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढवत युतीची दिशा बदलल्यामुळे भाजपच्या या महत्त्वाकांक्षी लक्ष्याला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तेत एकत्र असतानाही प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने आल्याचं चित्र दिसत असून, याचा थेट परिणाम मतदारांवर होण्याची भीती भाजपच्या गोटात व्यक्त केली जात आहे. खासगी तसेच शासकीय सर्व्हेंमध्येही भाजपला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे पक्षातील अस्वस्थता वाढली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 2500 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी जाहीर करताना पक्षाने अनेक जुने, निष्ठावंत कार्यकर्ते डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. याच निर्णयामुळे पक्षात नाराजीचा सूर उमटला. नाराज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिथून उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. परिणामी भाजपसमोरच भाजपचे माजी नेते उभे ठाकल्याने ‘मिशन 125’ धोक्यात येण्याची शक्यता सर्व्हेंमध्ये व्यक्त केली जात आहे.

वरिष्ठ नेत्यांना चांगलेच फटकारल्याची चर्चा

या घडामोडींची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. प्रचारासाठी पुण्यात आले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना चांगलेच फटकारल्याची चर्चा आहे. सोमवारी रात्री कात्रज येथे झालेल्या जाहीर सभेत फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. सत्तेत असूनही राष्ट्रवादीकडून होत असलेल्या हालचालींमुळे भाजपला होणाऱ्या नुकसानीचा सूर या भाषणांतून स्पष्ट दिसून आला.

बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा

मात्र, खरी राजकीय खलबतं सभा संपल्यानंतर रंगली. मुख्यमंत्री फडणवीस विमानतळाकडे रवाना होत असताना त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे एकाच वाहनातून प्रवास करत होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री गाडीत बसल्यानंतर चंद्रकांत पाटील तेथे पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोहोळ यांना बोलावून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर तिघेही नेते विमानतळावर पोहोचले आणि बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे.

तातडीने राजकीय व्यूहरचना बदलण्याचे आदेश

या बंद दाराआड झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिकेतील 165 जागांचा सविस्तर आढावा घेतल्याचं सांगितलं जात आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजपची स्थिती कमकुवत आहे किंवा जिथे खासगी व शासकीय सर्व्हेंमध्ये विरोधकांचा कौल दिसून येत आहे, त्या ठिकाणी तातडीने राजकीय व्यूहरचना बदलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक पातळीवर समन्वय वाढवणे, नाराज नेत्यांना पुन्हा सक्रिय करणे आणि बंडखोरी रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्याची चर्चा आहे.

पुण्यातील काही बड्या नेत्यांची शाळा

दरम्यान, भाजपने महापालिका निवडणुकीत किमान 120 नगरसेवक निवडून आणण्याचं उद्दिष्ट ठेवले असले, तरी निष्ठावंतांना डावलून ‘आयात’ उमेदवारांना संधी दिल्यामुळे काही प्रभागांतील जागा धोक्यात आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील काही बड्या नेत्यांची ‘शाळा’ घेतल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. धोकादायक जागांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देत, प्रचार आणि संघटन या दोन्ही आघाड्यांवर कसून काम करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुण्यात भाजपची रणनिती अधिक आक्रमक आणि बदललेली पाहायला मिळणार, अशीच चिन्हं सध्या दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *