पिंपरी-चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते झाले. युवक-युवतींना नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
.
युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा महोत्सव २९ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत निगडी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात सुरू आहे.
यावेळी बोलताना आयुक्त उगले यांनी युवक-युवतींना एआय (AI) तंत्रज्ञानाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करून आपल्या कला व करिअरमध्ये यश मिळवण्याचे आवाहन केले. एआयसारखे आधुनिक तंत्रज्ञान युवकांसाठी समान संधी घेऊन आले असून, त्याचा नावीन्यपूर्ण वापर करून कौशल्ये सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजची पिढी ऊर्जावान असून, त्यांच्या क्षमतांचा उपयोग नवोपक्रम आणि कलागुणांच्या विकासासाठी व्हावा. महोत्सवातून केवळ फोटो आणि प्रमाणपत्र नव्हे, तर उज्ज्वल भविष्य घडविणारी सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जा, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सतिश राउत यांनी युवकांना प्रेरणा देणारी उदाहरणे देत यशस्वी होण्यासाठी चिकाटी व सातत्याचा कानमंत्र दिला. भावी लेखक व कवींनी दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्य समृद्ध करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
उद्घाटनप्रसंगी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहायक संचालक मिलिंद दिक्षित, चंद्रशेखर साखरे, अर्णव महर्षी, राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कारार्थी (बॉक्सिंग) हितेंद्र सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी महोत्सवाची पार्श्वभूमी विशद करत निवास, भोजन, किट आदी सुविधांची माहिती दिली.
या राज्यस्तरीय युवा महोत्सवात पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक व मुंबई या आठ विभागांतून १५ ते २९ वयोगटातील एकूण ३१२ युवक-युवती सहभागी झाले आहेत. लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व व काव्यलेखन अशा विविध कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे.

