धनगर आरक्षणासाठी दीपक बोऱ्हाडेंचे आंदोलन स्थगित:22 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, काय निर्णय होणार?

[ads1]


धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीत गुरुवारी काढण्यात आलेल्या महामोर्चानंतर सुरू झालेले आंदोलन अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले. आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी 22 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत काय निर्णय होतो, याकडे आता धनगर समाजाचे लक्ष लागले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (17 सप्टेंबर) परभणीत मोठा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्याच्या विविध भागांतून समाजबांधव सहभागी झाले होते. विविध राजकीय पक्षांतील धनगर समाजाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले. मोर्चानंतर झालेल्या सभेत आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली. सभा संपल्यानंतर दीपक बोऱ्हाडे यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. सरकारकडून ठोस निर्णय होईपर्यंत आपण घटनास्थळ सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सभा संपल्यानंतरही अनेक कार्यकर्ते घटनास्थळी थांबून राहिले. परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या. पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल सायंकाळी परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी दीपक बोऱ्हाडे यांच्याशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, आरक्षणाबाबत ठोस निर्णय किंवा सरकारकडून स्पष्ट आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका बोऱ्हाडे यांनी घेतली. दरम्यान, धनगर समाजातील काही नेतेही घटनास्थळी दाखल झाले. सरकारमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा सुरू करण्यात आली. आंदोलन मागे घेण्यासाठी आणि पुढील चर्चेचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. बैठकीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित दीर्घ चर्चेनंतर 22 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर बोऱ्हाडे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी बोऱ्हाडे यांनी सांगितले की, आंदोलनस्थळी बसून राहिल्याने तातडीने निर्णय होणार नाही. तसेच पुढील दिवशी मंत्रिमंडळाची बैठकही नसल्याने त्याचा तत्काळ उपयोग होणार नाही. त्यामुळे सरकारने चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला असून नेत्यांनीही याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर 22 सप्टेंबरच्या बैठकीपर्यंत सरकारला एक संधी देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ’22 तारखेला काय होतं ते पाहू’ बोऱ्हाडे म्हणाले की, “नेते मंडळींनी प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा मान ठेवून आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत. 22 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, ते पाहू. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार प्रश्न सोडवण्यासाठी पुढील कार्यवाही होणे अपेक्षित आहे.” दरम्यान, आंदोलन स्थगित झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही हळूहळू माघार घेतली. मात्र, धनगर आरक्षणाचा प्रश्न अद्याप कायम असून 22 सप्टेंबरच्या बैठकीत सरकारकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर:बारावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून, तर दहावीची 15 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला आता अधिक वेग येणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 16 मार्चपर्यंत चालेल. त्यानंतर दहावीच्या लेखी परीक्षेला 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल आणि 11 मार्चला परीक्षा संपणार आहे. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *