![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता ‘ठाकरे’ बंधूंच्या युतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील जागा
.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. महापालिकेतील जागावाटपासाठी ‘मातोश्री’वर झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 या तीन जागांवरून सुरू असलेली ओढाताण आता थांबली आहे. ठरलेल्या सूत्रानुसार, शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटासाठी तर एक प्रभाग मनसेसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दादर-माहीममधील वॉर्डवर दोन्ही पक्षांचा दावा
शिवडीचा पेच सुटल्यानंतर आता सर्वांचे लक्ष दादर, माहीम, भांडूप आणि विक्रोळी या मराठीबहुल पट्ट्याकडे लागले आहे. विक्रोळी आणि भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 109, 110, 114 आणि 115 या चार जागांवर, तसेच दादर-माहीममधील 192, 193 आणि 194 या तीन वॉर्डांवर दोन्ही पक्षांनी आपला दावा सांगितला आहे. या संदर्भात विशाखा राऊत, आमदार सुनील राऊत, खासदार संजय दिना पाटील हे मनसेच्या नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्याशी सविस्तर चर्चा करत आहेत.
युतीच्या घोषणेसाठी नियोजन सुरू
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या अधिकृत घोषणा करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून एका भव्य मेळाव्याचे किंवा ऐतिहासिक पत्रकार परिषदेचे नियोजन सुरू आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को सेंटर, बांगुर नगर मैदान किंवा वरळीतील डोम या तीन ठिकाणांची चाचपणी केली जात आहे. आज दिवसभरात उर्वरित जागांचे वाटप अंतिम करून युतीचा ‘धडाका’ उडवून देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतर महानगरपालिकांच्या जागावाटपाची चर्चाही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
कोकाटेंसाठी 6 तास, 40 आमदारांवर अजुन निर्णय नाही
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या विजयावर सडकून टीका केली आहे. “नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजपला मिळालेला अभूतपूर्व विजय हा केवळ अभूतपूर्व पैशांच्या उधळपट्टीचा परिणाम आहे,” असा आरोप त्यांनी केला. शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही धारेवर धरले. “माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय सहा तासांत निर्णय देते, मात्र 40 आमदारांच्या अपात्रतेवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. कारण सर्वोच्च न्यायालयावर दबाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यामुळेच शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालासाठी 21 जानेवारी ही निवडणुकीनंतरची तारीख दिलेली आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
