नांदेड – विठुनामाचा गजर आणि वारकरी दिंडी ही महाराष्ट्राची प्राचीन आणि पवित्र संस्कृती आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत हजारो वारकरी ज्ञानबा-तुकाराम व माऊली-माऊलीचा जयघोष करत पंढरपूरच्या वाटेने चालतात. वारीची चालताना सतत “राम कृष्ण हरी” आणि विठू नामाचा गजर केला जातो. अभंग गायन, हरिपाठ आणि फुगड्या खेळत वारकरी तल्लीन होतात. जात-पात विसरून सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करतात. परंतु सर्वांनाच पंढरीला जाता येत नाही. दिंडीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे आषाढी एकादशीचे औचित्य साधून तालुक्यातील रहाटी बु. येथील शंकर विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांच्या सहभागाने वारकरी दिंडी काढण्यात आली.
आषाढी वारीचा गजर करीत दिडींसाठी शाळा परिसरात विद्यार्थी विद्यार्थीनींनी वारकरी वेशभूषा परिधान करून मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. कोणी हातात भगवे झेंडे घेत, विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा हातात घेऊन, फुगडी खेळत, टाळ मृदुंगाच्या जयघोषात विठ्ठल विठ्ठल, बोला पुंडलिकवरदा हरिविठ्ठल… श्री ज्ञानेदव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय… असा जयघोष करीत शाळा परिसरातून विठ्ठल रुक्मिणी मंदीर व मारोती मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक तानाजी पवार, अशोक चव्हाण, शिवाजी ढगे, भानुदास मोरे, राजपाल लांडगे, भिमराव सकनुरे, उमेश गज्जेवार, अमोल जिवतोडे, प्रविण इंगोले, बालाजी डोंगळीकर, भगवान महाराज, प्रभू बोकारे, भिमराव पाटील बोकारे, दत्तराम बोकारे(पहेलवान), व्यंकटराव मोरे, भगवानराव बोकारे आदींची उपस्थिती होती.
Post Views: 136