![]()
साताऱ्यातील सावरी येथे उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ड्रग्ज रॅकेटमधील आरोपी ओंकार डिघे घटनास्थळी सापडला असतानाही त्याला का सोडू
.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या, “ओंकार डिघे हा स्पॉटवर असताना त्याला अटक का झाली नाही? तो नंतर रात्री उशिरा स्वतःहून मुंबईच्या युनिट नंबर ७ कडे हजर होतो, हे संशयास्पद आहे. याचा अर्थ, सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांना पोलीस अटक करत नाहीत, तर ते स्वतःच्या सोयीने हजर होतात. वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर ही याचीच उदाहरणे आहेत.”
४० लिटर लिक्विडचे रहस्य
पोलीस तपासातील हलगर्जीपणा उघड करताना अंधारे यांनी सावरी येथील घटनाक्रमाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “काल आमची पत्रकार परिषद आटोपल्यानंतर अवघ्या दोन तासांत सातारा पोलिस सावरीला पोहोचले होते. त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोहोचली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याला विचारले असता, आमच्याकडे काही तपास नाही, मी सहज आलो असे सांगितले जाते. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही, तर इतक्या तत्परतेने सातारा पोलिस तिकडे का पोहोचले? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी तिथे काहीतरी सामान उचचले, तर त्याचा काही गैरवापर होऊ नये, यासाठी ते उचलल्याचे पोलिस सांगतात. दार उघडल्यानंतर आत एक चाळीस लीटर निळ्या रंगाची कॅन दिसते. याबाबत पोलिसांना विचारले असता, ते म्हणतात की, हे राहिलेले सामान होते, चुकून राहिले असेल. जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती, तर ती कॅन चुकून कशी राहील? आणि जर चुकून राहिली असेल, तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. एवढे मोठे लिक्वीड चुकून कसे राहील?”असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
फॅक्टरी अजूनही सुरू?
पोलिसांनी आधी सर्व परिसर ‘क्लिन’ केला होता, मग आता अचानक तिथे पुन्हा कॅन कसा सापडतो? यावर बोट ठेवत अंधारे यांनी गंभीर शंका उपस्थित केली. “याचा दुसरा अर्थ असा होतो की, त्या भागात अजूनही फॅक्टरी सुरू आहे किंवा ड्रग्ज माफियांचा वावर तिथे आहे,” असा आरोप त्यांनी केला.
