विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही:आमदार संजय केनेकरांनी आमदारकीचा पत्ता कट होताच व्यक्त केल्या भावना; पुनरागमनाचे संकेत
![]()
भाजपने विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात प्रज्ञा सातव वगळता इतर 5 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या आमदार संजय केनेकर यांचा पत्ता कट झाला आहे. संजय केनेकर यांनी या प्रकरणी कवीवर्य सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला देत हा आपला पराभव नसल्याचे स्पष्ट करत आपल्या पुनरागमनाचे संकेत दिलेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने यापैकी आपल्या वाट्याला येणाऱ्या 6 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देत यावेळीही धक्कातंत्र वापरले. यात सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे व प्रमोद शांताराम जठार यांचा समावेश आहे. याशिवाय प्रज्ञा सातव यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे संजय केनेकर यांच्यासह विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ संपणाऱ्या कोणत्याही आमदाराला पुन्हा संधी मिळाली नाही. यामुळे हे आमदार नाराज असल्याची माहिती आहे. काय म्हणाले संजय केनेकर? संजय केनेकर यांना उमेदवारीची अपेक्षा होती. पण त्यांच्याही नावाचा फेरविचार करण्यात आला नाही. यामुळे संजय केनेकर यांनी कवीवर्य सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला देत आपल्या भावना व्यक्त करत आपल्या पुनरागमनाचे संकेत दिलेत. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही, अशी भावना संजय केनेकर यांनी या प्रकरणी व्यक्त केली. कोण आहेत संजय केनेकर? संजय केनेकर हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 आमदारांत त्यांचा समावेश आहे. केनेकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू म्हणून ओळखले जातात. विद्यार्थीदशेपासूनच ते भाजपचे काम करतात. त्यांनी भाजपमध्ये वेगवेगळी पदे भूषवली. मार्च 2020 मध्ये त्यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळाली होती. पण आता कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा पक्ष संघटनेत कार्यरत होतील. हे ही वाचा… राज्य सरकार बोलावणार विशेष अधिवेशन:महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन; मंत्रालयात हालचाली सुरू झाल्याचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुढील महिन्यात राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. सध्या या अधिवेशनाची तारीख निश्चित झाली नाही. पण त्यासंबंधीच्या हालचालांनी मंत्रालयात चांगलाच वेग आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. वाचा सविस्तर
