स्वत:च्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे काळाची गरज:वाकी बुद्रुकमध्ये डॉ. गायकवाड यांचे प्रतिपादन
![]()
नेत्र तपासणी शिबिर हे आरोग्याची काळजी घेण्याचे आणि डोळ्यांचे संरक्षण करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डोळे हे शरीराचे अनमोल अवयव असून, त्यांची वेळीच काळजी घेणे भविष्यातील गंभीर समस्या टाळण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. वाकी बुद्रुक येथे डॉ. वसंतराव पवार रिसर्च सेंटर वैद्यकीय महाविद्यालय (आडगाव, नाशिक), राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि शिवतेज नेहरू युवा ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी १४१ रुग्णांची तपासणी केली. यावेळी बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक अनेकदा डोळ्यांच्या विकारांकडे दुर्लक्ष करतात. डोळ्यांवर पांढरा पडदा येणे, अंधूक दिसणे किंवा दृष्टी कमी होणे, अशी लक्षणे दिसून आल्यास त्याचा ताण संपूर्ण शरीरावर जाणवतो. अशा वेळी ही शिबिरे जनतेच्या हिताची ठरतात. नागरिकांनी आरोग्याप्रती जागरूक राहून अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या शिबिरास गणेश महाले, संदीप शिंदे, सचिन ठाकरे, कृष्णा ठाकरे, अभिमन्यू ठाकरे आदींची उपस्थिती होती.
