आता पाणी, शिक्षण, आरोग्य त्रिसूत्रीवर पालकमंत्र्यांचा भर:चार आमदारांसह अधिकारी-पदाधिकाऱ्यां ची जंंबो उपस्थिती
![]()
शहराचा विकास करताना पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर द्यावा, अशी सूचना करतानाच अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय राखून काम करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे
.
अमरावती शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आज, शनिवारी दुपारी त्यांनी महापालिकेचा आढावा घेतला. आढावा सभेला अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, बडनेराचे आमदार रवि राणा, विधान परिषद सदस्य संजय खोडके व धीरज लिंगाडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, तसेच पालिकेच्या बहुतेक सर्वच विभागांचे अधिकारी अशी जम्बो उपस्थिती होती. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.
बैठकीस महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, गटनेता नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, महिला बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे, उपसभापती लता देशमुख, विधी समिती उपसभापती डॉ. मधुरा काहाळे, आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, नगरसेवक व विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रासाठी देणार ४५ कोटी शहरातील शाळा, अंगणवाड्या आणि दवाखान्यांची गुणवत्ता फारशी चांगली नाही. वास्तविकता लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहेत. अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करून बालकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावरही त्यांचा भर आहे.
बेघर नागरिकांची यादी करा तयार पालकमंत्र्यांच्या मते शहरातील बेघर नागरिकांना प्राधान्य देत घरांचे पट्टे (हक्कपत्रे) वाटप करण्यात यावे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, अशा नागरिकांची सर्वंकष यादी तयार करावी. त्यांना विविध गृहनिर्माण योजनांद्वारे घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलविस्तार योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील सर्व भागांमध्ये नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले.
