महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांत 175 वाघांचा मृत्यू:11 ची शिकार तर 18 वाघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू




महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षांत वाघांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2022 ते 2026 या कालावधीत राज्यात 24 वाघांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणांमध्ये मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही आणि कोणतीही जबाबदारीही निश्चित करण्यात आलेली नाही. वनविभागाच्या या कारभारावर वन्यजीवप्रेमींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वनविभागाकडून ही माहिती मिळवली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात एकूण 175 वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 95 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला, तर 27 वाघांना रस्ते आणि रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला. याशिवाय, 11 वाघांची शिकार झाली असून, 18 वाघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, 24 मृत्यूंचे कारण अजूनही अज्ञात असून, एकट्या 2026 या वर्षात सर्वाधिक 12 अज्ञात मृत्यूंची नोंद झाली आहे. हे मृत्यू ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट आणि उमरेड-पवनी-करहांडला यांसारख्या प्रमुख व्याघ्रप्रकल्पांमध्ये तसेच चंद्रपूर परिसरातील संरक्षित क्षेत्राबाहेर घडले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये वाघांचे अवयव जप्त करूनही तपास कायदेशीर निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेला नाही. फॉरेन्सिक अहवाल आणि शवविच्छेदन प्रक्रियेतील विलंबामुळे मुख्य पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाघांच्या मृत्यूचे मुख्य कारणच स्पष्ट झाले नाही, तर गुन्हेगारांवर कारवाई करणे कठीण होईल आणि वन्यजीव गुन्हे बिनधास्तपणे घडत राहतील, असा इशारा वन्यजीव तज्ज्ञांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *