नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभा सभागृहात युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार क्षेत्रीय निर्देशालय पुणे, माय भारत, नांदेड तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘विकसित भारत युथ पार्लमेंट – 2026’ दिनांक ५ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले.
या युवा संसद वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी होते. यावेळी मंचावर दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहालानी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपाल चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, युवा संसदेचे नोडल अधिकारी डॉ. केशव आलगुले तसेच रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. भागवत पस्तापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या युवा संसदेसाठी विद्यार्थ्यांना “आणिबाणी नंतरचे पन्नास वर्षे : भारतीय लोकशाहीसाठी धडा” (50 Years of Emergency: Lessons for Indian Democracy) हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेसाठी माय भारत पोर्टलवर १३१ स्वयंसेवकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३८ स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून इंदिरा गांधी महाविद्यालय, सिडको नांदेड येथील डॉ. भागवत पस्तापुरे, जयक्रांती महाविद्यालय, लातूर येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. गीता वाघमारे, शिवनेरी महाविद्यालय, शिरूर अनंतपाळ येथील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ. अनिल इंगळे, राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड येथील डॉ. दत्तात्रय म्हेत्रे तसेच हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालय, अर्धापूर येथील डॉ. नारायण शिवशेट्टे यांनी काम पाहिले.
समारोप व बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी परीक्षा मूल्यमापन व नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी युवा संसदेसारखे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
यावेळी माय भारतच्या प्रतिनिधी व जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंद्रकला रावळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, युवा संसद ही युवकांना लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारी आणि अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणणारी महत्त्वाची संधी आहे. युवकांनी या व्यासपीठावर निर्भीडपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले विचार मांडावेत. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देश पातळीवर लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवकांकडून सकारात्मक कार्य घडू शकते. तसेच माय भारत पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. युवा संसदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post Views: 73
