![]()
2029 च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे शरद पवारांशी संधान साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपला आव्हान देतील. तसेच उद्धव ठाकरेही पवारांची साथ सोडून भाजपसोबत जातील, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रविवारी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. लक्ष्मण हाके यांनी रविवारी सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपरोक्त दावा केला. ते म्हणाले, आगामी निवडणुकांत म्हणजे 2029 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी व अजित पवारांची राष्ट्रवादी हे 3 पक्ष एका बाजूला असतील. तर भाजप व उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येतील. यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल. ह्याची सुरुवात नुकत्याच झालेल्या पंचायत राज निवडणुकीत झाली. या निवडणुकीत ज्या पद्धतीने आघाड्या झाल्या ते पाहता आता नवीन ध्रुवीकरणाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होते. शिंदे गटाकडून वारंवार फडणवीस, भाजपवर टीका शिंदे गटाचे मंत्री व नेते अलीकडच्या काळात वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपला अडचणीत आणणारी विधाने करत आहेत. महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने भाजपला विरोध करण्याची भूमिका घेतली. अनेक ठिकाणी शिंदे गट व दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी एकनाथ शिंदे भरून काढण्याचा जोरदार प्रयत्न करतील. ज्या पद्धतीने त्यांनी पंचायतराज निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला विरोध केला. ते पाहता या तीन पक्षांची आघाडी पुढील निवडणुकीत दिसेल यात शंका नाही, असे ते म्हणाले. राज ठाकरेंना जनाधार उरला नाही लक्ष्मण हाके यांनी यावेळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेला कोणताही जनाधार उरला नसल्याचाही दावा केला. राज ठाकरे यांच्या मनसेला आता कोणताही जनाधार उरला नाही. राज यांनी आतापर्यंत अनेकदा भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांना आणखी काही वर्षे तयारी करण्याची गरज आहे. पण भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपसोबत आल्याचे चित्र 2029 च्या निवडणुकीत दिसेल हे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून भाजपसोबतच्या युतीशी फारकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यात उद्धव स्वतः मुख्यमंत्री झाले होते. पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 2022 मध्ये मोठे बंड होऊन शिवसेना फुटली. सध्या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदेंच्या ताब्यात आहे. शिंदे स्वतः भाजपसोबत सत्तेत आहेत. पण आता लक्ष्मण हाके यांनी शिंदे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिंदे पवारांच्या मदतीने फडणवीसांना आव्हान देणार:उद्धव ठाकरेही भाजपसोबत जाणार, लक्ष्मण हाके यांच्या दाव्याने राजकीय खळबळ
