![]()
संजय राऊत यांनी खासदारकी आणि राजकारण सोडले पाहिजे, त्यांनी वेब सिरीज काढण्याचा धंदा सुरू केला पाहिजे. इराण-इस्रायल युद्ध हे एपस्टीन फाइल्सवरील लक्ष विचलीत करण्यासाठी घडवण्यात येत आहे, असा जावई शोध राऊतांनी लावला आहे, कल्पना करताना तरी विचार करा, वेबसिरीजला शोभेल असे तुम्ही लिहतात, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, तुमच्या खासदार निधीतून तुम्ही एकही जनहिताचे काम केलेले नाही.नुसते राज्यसभेची खुर्ची घेतली पण देशासाठी जनतेसाठी काहीच केले नाही. जनसेवा करणे तुमच्या रक्तातच नाही, जनतेची सेवा करणे तुम्हाला जमलेले नाही, तुम्ही खासदारकी सोडत वेबसिरीज काढली पाहिजे, तुम्हाला आंतरराष्ट्रीय मेडल मिळू शकेल. कटकारस्थानांच्या कथा सांगण्यात राऊत पटाईत आहेत. राज्यसभेसाठी मविआत संघर्ष नवनाथ बन म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीवरुन मविआमध्ये संघर्ष बघायला मिळतो आहे. तिन्हीही पक्ष एकमेकांना पाण्यात बघत आहे. सुप्रिया सुळेंनी उद्धव् ठाकरेंची भेट घेतली तरीही आदित्य ठाकरेंकडून आमचा निर्णय झाला नाही असे ट्विट करण्यात येते. याचा अर्थ आदित्य ठाकरेंचा शरद पवारांच्या उमेदवारीला विरोध दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत हे शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मविआत बिघाडी दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंना वाटते की प्रियंका चतुर्वेदींना संधी मिळावी, राऊत अन राष्ट्रवादीला वाटते की शरद पवारांना पुन्हा संधी मिळावी. तर काँग्रेस आपलेच घोडे पुढे दामटत आहे. आदित्य ठाकरेंचा राऊतांना विरोध नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये असलेले मतभेद ही राज्यसभा निवडणुकीत सामोरे आले आहेत. शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. ते रुग्णालयातून बाहेर सुद्धा आले आहेत. उद्या शरद पवारांचा अर्ज भरला जाईल. पण त्यापूर्वी आदित्य ठाकरे त्याच्या उमेदवारीला विरोध करत आहे, म्हणजे ते राऊतांना विरोध करत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. राज्यसभेचा अधिकार राऊतांकडे नाही नवनाथ बन म्हणाले की, राज्यसभेचा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार संजय राऊत यांच्याकडे नाहीच. कारण शरद पवार यांना खासदारकी मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. आता जर प्रियंका चतुर्वेदींना संधी मिळाली तर तुम्हाला 2 वर्षींनी संधी मिळणार नाही. दोन वर्षांनी आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रियंका चतुर्वेदीचा पत्ता कापण्याचे काम राऊत करत आहे. मविआमध्ये राज्यसभेसाठी एकमत होऊ शकत नाही तर हे लोकं राज्यासाठी काय एकमत करणार असा टोला बन यांनी लगावला आहे. राऊतांना युद्ध करण्यासाठी पाठवावे नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राष्ट्राच्या प्रमुखांनी चर्चा केली. राऊत म्हणतात की इराणशी चर्चा केली नाही कारण तिथे राऊतांना युद्ध करण्यासाठी पाठवावे लागणार आहे. त्यांनी इराणमध्ये जात लढाईत उतरले पाहिजे. इराणमध्ये शिष्टाई करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात यावी. तर मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणाऱ्या राऊतांना फ्रंटवर पाठवण्याची मागणी बन यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार माती खाल्ल्यामुळेच उभाठा गटाचा पराभव झाला असून यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही.
संजय राऊतांना युद्धासाठी इराणला पाठवा!:मविआत राज्यसभेवरून मतभेद, प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न- नवनाथ बन
