![]()
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात मंगळवारी ३ मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. रंग खेळल्यानंतर दुपार दरम्यान तलावात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सागर गहाणे (वय १६) आणि प्रणय गहाणे (वय १३) अशी मृतकांची नावे आहेत. मंगळवारी सर्वत्र धुळवड खेळली गेली. लोक रंगात न्हाऊन निघाले. घरचा माणूस ओळखू येऊ नये इतके लोक रंगात रंगले. गावखेड्यात लोक तलावावर आंघोळीसाठी जातात. सागर आणि प्रणय हेही अंघोळीसाठी तलावात गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळ करताना दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, संबंधित घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
धुलिवंदनाच्या आनंदावर विरजण:गोंदियात दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू
