![]()
टाकरखेडा शंभू येथील जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, विद्यार्थी आणि नागरिकांना शाळेत पोहोचणे तसेच ये-जा करणे कठीण झाले आहे. या पाण्याखालील मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, पालक, तसेच खाजगी नोकरी करणारे कर्मचारी, व्यापारी आणि टाकरखेडा शंभू-रामा साऊर मार्गावरील प्रवाशांना ये-जा करावी लागते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना मार्ग काढणे अशक्य झाले असून, पायी चालणाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. ही समस्या नवीन नसून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात याच ठिकाणी पाणी साचून मार्ग बंद होतो. नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, गावाच्या परिसरातील शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, तूर, सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. त्यांनी प्रभावी जलनिचरा व्यवस्था करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
टाकरखेडा शंभू जि.प. शाळेचा रस्ता पाण्याखाली:विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय; कायमस्वरूपी निचऱ्याची मागणी
