![]()
गणित विषयाचा पेपर म्हटले की विद्यार्थ्यांच्या मनात मोठी भीती असते. परंतु, शनिवारी (२१ फेब्रुवारी) या अवघड विषयाचे गणित सुटले अन् विद्यार्थी प्रसन्न चेहऱ्याने परीक्षा केंद्राबाहेर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची लेखी परीक्षा सध्या सुरू असून, शनिवारी सकाळच्या सत्रात गणित आणि संख्याशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. ८० गुणांच्या या पेपरमध्ये १६ गुणांचे बहुपर्यायी प्रश्न यंदा काहीसे प्रदीर्घ असल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, ज्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातून प्रामाणिक तयारी केली होती, त्यांना प्रमेय आणि सिद्धांतावर आधारित प्रश्न अतिशय सोपे गेले. प्रश्नपत्रिकेतील डी सेक्शनमधील ४ गुणांचे प्रश्न नेहमी वेळखाऊ असतात, मात्र यंदा ते गेल्या वर्षीच्या तुलनेत सोपे असल्याचे गणितज्ञ प्रा. बाळासाहेब पवळ यांनी सांगितले. त्यांच्या मते, १२ गुणांसाठी विचारले गेलेले सिद्धांत आणि बी-सी सेक्शनमधील सोप्या प्रश्नांमुळे सामान्य विद्यार्थीही ४५ ते ५० गुण सहज मिळवू शकेल. विभागात ४ कॉपी केसेस एकीकडे पेपर सोपा गेल्याचा आनंद असतानाच दुसरीकडे कॉपीबहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शनिवारी गणित विषयाच्या पेपरमध्ये विभागात एकूण ४ कॉपी केसेसची नोंद झाली. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील चापानेर येथील चंपावती उच्च माध्यमिक विद्यालयात ३ तर परभणीत १ विद्यार्थी कॉपी करताना आढळला, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.
४५ ते ५० गुण मिळवणे सुलभ:प्रमेय अन् सिद्धांतांचे गणित सोपे गेल्याने ८० गुणांच्या पेपरने विद्यार्थ्यांना दिलासा
