![]()
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणात संविधानांचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने चांगलेच वातावरण तापले आहे. वाद चिघळल्यानंतर गिरीश महाजन यांनी आपण अनावधानाने नाव घ्यायचे विसरलो, असे स्पष्टीकरण दिले. आता यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गिरीश महाजन यांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अनावधानाने नाव घ्यायचे विसरलात, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाकण्यात यावे, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे. गिरीश महाजन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ज्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झालात, ते संविधान कोणी लिहिले हेच जर तुम्हाला माहिती नसेल, त्यांचे नाव तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्हाला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी टीका करत आंबेडकरांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आरएसएस नेहमीच दुतोंडी भूमिका घेते पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आरएसएस नेहमीच दुतोंडी भूमिका घेते. एकीकडे आम्ही बाबासाहेबांना मानतो असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांच्या विरोधात कृती करायची. हिंदू कोड बिलाला सर्वात आधी विरोध कोणी केला असेल तर तो आरएसएसनेच केला होता. मनुस्मृतीने महिलांना हिंदू धर्मात कोणताही अधिकार दिला नव्हता, ना मालमत्तेचा, ना वैयक्तिक, ना स्वतःच्या शरीराचा. हे सर्व अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिले. त्यामुळेच आज एक महिला अधिकारी (माधवी जाधव) जाब विचारण्यासाठी पुढे आली, असे आंबेडकर म्हणाले. अनावधानाने मंत्रिपदही काढून टाकण्यात यावे गिरीश महाजन यांनी आपण अनावधानाने नाव घ्यायचे विसरल्याचे म्हटले होते, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, जर हीह चूक अनावधानाने झाली असेल, तर तुमचे मंत्रिपदही अनावधानाने काढून टाकण्यात यावे. ही काही छोटी-मोठी चूक नाही. तसेच ज्यांनी हे भाषण लिहून दिले त्यांच्यावर आणि ज्यांनी वाचले त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. महाजनांनी स्वतःच्या हाताने भाषण लिहिले असेल किंवा लिहून दिले असेल तरीही त्यांनी आंबेडकरांचे नाव वाचले नसेल, तर त्यांच्या कर्तव्यातील कसूर आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे.
अनावधानाने चूक, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाका:प्रकाश आंबेडकरांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल; वंचितची आक्रमक भूमिका
