![]()
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत आता ‘घातपाता’चा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावाने आज, रविवारी ‘गावबंद’ची हाक दिली आहे. ग्रामपंचायतीने यासंदर्भात पोलीस निरीक्षकांना पत्र दिले असून, या मागणीला स्थानिक संघटना आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे. लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने येत असलेल्या बातम्या पाहता, हा अपघात नसून घातपात असण्याची दाट शक्यता वाटत आहे. विमान अपघातामागील नेमके सत्य समोर येण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत.” या मागणीसाठी आज गावातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आमच्या गावातील सर्व संघटना व ग्रामस्थ आजच्या बंदमध्ये सामील होणार आहेत. त्या काळ्या दिवसाची आठवण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी २८ जानेवारी रोजी अजित पवार बारामतीकडे येत असताना ही भीषण दुर्घटना घडली होती. त्यांचे विमान धावपट्टीवर उतरत असताना कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. २९ जानेवारी रोजी बारामतीत अलोट गर्दीच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमदार रोहित पवारांचे गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताबाबात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणी आतापर्यंत तीन पत्रकार परिषद घेतल्या आहेत. रोहित पवारांनी या अपघातावर अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या प्रेझेन्टेशन मांडले. काही पुरावे सादर केले. तर कडी जुळवत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. विमानामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्यात आले होते, ज्यामुळे स्फोटाची तीव्रता वाढली, असा दावा त्यांनी केला. रोहित पवारांनी ‘व्हीएसआर’ (VSR) विमान कंपनी आणि वैमानिक सुमित कपूर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. वैमानिकाने मुद्दाम विमान जमिनीवर आदळले असावे का? अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली. चौकशीची मागणी तीव्र दरम्यान, या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरणाचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटू लागले आहेत. ग्रामस्थांची गावबंदची हाक आणि आमदारांनी उपस्थित केलेले मुद्दे लक्षात घेता, या दुर्घटनेची चौकशी कोणत्या स्तरावर आणि कितपत होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार विमान अपघात प्रकरण:लोणी भापकर ग्रामस्थांना घातपाताचा संशय, आज गाव बंदची हाक; ग्रामपंचायतीचे पोलिसांना पत्र
